निलंगा/उदगीर : लोकसभेच्या निवडणुकीत शिवरायांचे नावही न घेणाऱ्या मोदींना आत्ताच कसे छत्रपत्री शिवाजी महाराज आठवले, असा सवाल करीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाजपा दुतोंडी भूमिका घेत असल्याची टीका केली़ राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी झाल्यास निलंग्याचा बारामतीसारखा विकास करण्याचे आश्वासन दिले़ राकाँचे निलंगा मतदारसंघातील उमेदवार बसवराज पाटील नागराळकर तर उदगीर मतदारसंघातील संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची निलंगा व उदगीर येथे सभा झाल्या़ यावेळी त्यांनी राष्ट्रवादीने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन राष्ट्रवादी काँग्रेस सर्व समाजघटकांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले़ मराठा, लिंगायत, मुस्लिम आरक्षणाविषयी आपणच पुढाकार घेतल्याचा दावाही पवारांनी केला़ १०० दिवसांत काळा पैसा आणण्याची घोषणा करणाऱ्या भाजपाने १५० दिवस झाले तरी तांबडी कवडीही आणली नसल्याचे सांगत शेतमालाला कमी भाव देणारे धोरण स्विकारुन केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उध्वस्त केल्याची टीकाही पवारांनी केली़ एकिकडे गडकरी, फडणवीस महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करीत असताना मोदी मात्र तुकडे पडणार नसल्याचे सांगत आहेत़ आता जनतेने ऐकायचे कुणाचे, असा प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केला़ निलंग्याच्या सभेत उमेदवार बसवराज पाटील नागराळकर, आमदार विक्रम काळे, डी़एऩ शेळके, संजय बनसोडे, रामराव राठोड, चंदन पाटील, शिवाजी मुळे, मधुकर एकुर्केकर, गोपाळकृष्ण घोडके, प्रवीण भोळे, भरत चामले, सूर्यशीला मोरे, निर्मला वाडकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते़
निलंग्याचे बारामती करू : अजित पवार
By admin | Updated: October 9, 2014 00:38 IST