उस्मानाबाद : अपघतांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यातील अतिक्रमण हटव्यिाची मोहीम हाती घेण्यात आली होती. तरीही नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवर परत अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत आहे. परत अतिक्रमण होऊ नये, यासाठी पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी संबधित यंत्रणेला दिले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नगर परिषद हद्दीतील वाहतूक व इतर विषयांच्या नियोजनाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांनी हे निर्देश दिले. पुन्हा-पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणावर कायदेशीर कार्यवाही करावी, त्याचबरोबर व्यावसायिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करताना जिल्ह्यातील नगरपालिकांनी त्यांच्या ताब्यातील मोकळ्या जागेबाबतचा सर्वे करावा, मोकळ्या जागेत हॉकर्स, झोन व पार्किंग एरिया तयार करावा, याबाबत नगरपालिकांनी सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवून तो मंजूर करुन घ्यावा, या जागेची नोंद सर्वेला घेण्यात यावी, याचबरोबर टू-एन-वन वाहनाचे टेंडर काढणे, जॅमर ताबा पावती घेऊन त्या मोकळ्या जागेची प्रशासनाकडून रितसर नोंदणी करुन घ्यावी . टॅक्सी व रिक्षा स्टँड व्यवस्थेसाठी पार्किंग करणे, दराचे बोर्ड लावणे, दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.जिल्ह्यातील वाहतूक नियत्रणांसाठी एनसीसी, एनएसएस, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वेळापत्रक तयार करण्याबरोबरच नगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वांच्या सहकार्याने १५ जुलै २०१४ हा दिवस वृक्षलागवड दिन म्हणून साजरा करुन जास्तीत-जास्त झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपजिल्हाधिकारी भालचंद्र चाकूरकर, उपविभागीय अधिकारी शोभा राऊत, रवींद्र गुरव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय म्हेत्रेवार, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक वृषाली तेलोरे यांच्यासह सर्व नगर पालिकेचे मुख्याधिकारी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अतिक्रमणे रोखण्यासाठी आता पथकांची नियुक्ती
By admin | Updated: June 22, 2014 00:06 IST