लातूर : लातूर शहरातून काही दिवसांपूर्वी शाळकरी मुलाच्या अपहरणाच्या दोन घटना घडलेल्या असताना आणखी एका शाळकरी मुलाचे अपहरण झाल्याबाबत गांधीचौक पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दाखल झाली आहे़ पोलिसांनी सांगितले, लातुरातील तावरजा कॉलनीतील इस्लामपूरा भागात राहणारे पठाण यांचा १२ वर्षीय शाळकरी मुलगा सोमवार ३ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता शाळेत जातो म्हणून गेला असून अद्यापपर्यंत घरी परतला नाही़ तो लातूरच्या संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात इयत्ता सहावीच्या वर्गात शिकतो़ सोमवारी तो शाळेतही आला नसल्याचे शाळेतील शिक्षकांनी सांगितले़ त्याच्या पालकांनी त्याच्या शाळकरी मित्रांकडे व नातेवाईकांकडे शोध घेऊनही तो सापडला नाही़दरम्यान, कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी त्यास फूस लावून घेऊन गेल्याची तक्रार पठाण यांनी दिली आहे़ त्यावरुन गांधी चौक पोलिस ठाण्यात गुरनं २०२/१५ कलम ३६३ भादंविनूसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ पुढील तपास सपोनि वाघमोडे करीत आहेत़ अपहरणाच्या वाढत्या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातारवण आहे़ शालेय व्यवस्थापनाने अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ संदेश अथवा फोनद्वारे कळविल्यानंतर विद्यार्थ्याचा ठावठिकाणा समजू शकेल, असे मत व्यक्त होत आहे़जुलै महिन्यात दोन शालेय विद्यार्थ्यांचे अपहरण लातूर शहरातून करण्यात आले होते़ विशालनगर भागातून १८ जुलै रोजी तेरा वर्षीय शाळकरी मुलास चौघांनी पळवून नेण्याचा प्रयत्न जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला़ याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली होती़ तर २४ जुलै रोजी अमित पदकोंडे या ११ वर्षीय शाळकरी मुलाचे खाडगाव रोडवरील संभाजी नगरातून अपहरण करुन त्याचा खून केल्याप्रकरणी तिघे अल्पवयीन आरोपी बालसुधारगृहात ठेवले आहेत़
लातुरातून आणखी एका शाळकरी मुलाचे अपहरण
By admin | Updated: August 5, 2015 00:34 IST