पालम : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात निर्मल भारत अभियान रोजगार हमी योजनेंतर्गत ९०० शौचालयाचे बांधकाम विविध गावांमध्ये पूर्ण झाले आहे. या कामासाठी पंचायत समितीने पुढाकार घेतला आहे. पालम तालुक्यात ग्रामीण भागातील गावे हागणदारीमुक्त व निर्मल करण्यासाठी पंचायत समितीने शौचालय बांधकामाची मोहीम हाती घेतलेली आहे. शौचालयाच्या बांधकामासाठी पंचायत समितीकडून प्रत्येक लाभार्थ्याला नऊ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. यामध्ये निर्मल भारत अभियान ४ हजार ५०० तर रोजगार हमी योजनेतून उर्वरित ४ हजार ५०० रुपयांची रक्कम लाभार्थ्यांना अदा केली जाते. प्रत्येक गावात शौचालयाची कामे गतीने व्हावेत, यासाठी ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. शौचालयाच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे ४६० ई-मस्टर काढण्यात आले असून मजुरांना मजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत शहरासह तालुक्यात ९०० शौचालयाचे काम पूर्ण झालेले आहेत. या कामासाठी गटविकास अधिकारी मधुकर कदम, वचिष्ट पवार, संदीप डोईफोडे, संजय पंडित, अभियंता उन्हाळे, बांगर, अनिल शिंदे आदी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)निर्मल भारत अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये शौचालयाची कामे केली जात आहेत. शौचालय बांधकामासाठी अनुदान मिळत असल्याने ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्याने शौचालयाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे पालम तालुक्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त होण्याकडे वाटचाल करीत आहेत. प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व निर्मल होण्याची गरज आहे. शौचालयाच्या कामासाठी पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायती प्रयत्न करीत आहेत. शौचालय बांधकामासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. यामुळे गाव स्वच्छ होईल व शौचालय बांधकाम करणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होण्यास मदत होईल. शौचालय बांधकामास गती देण्यासाठी ग्रामस्थांंनी पुढे यावे व शौचालय बांधून घ्यावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी कदम यांनी केले आहे.
900 शौचालयाचे बांधकाम पूर्ण
By admin | Updated: September 30, 2014 01:27 IST