परंडा : गतवर्षीही अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र, रिमझीम स्वरूपाच्या पावसावर खरिपाची पिके चांगली आली होती. त्यानंतर रबीची पेरणी करण्यात आली. परंतु, अवेळी झालेल्या पावसामुळे ही पिके हातची गेली. त्यामुळे तालुका व परिसरात सध्या चाऱ्याची टंचाई भासत आहे. यंदाही महिनाभरानंतर पावसाने हजेरी लावली असली तरी अद्यापि दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पहावयास मिळत आहे. पाणी टंचाईमुळे हिरवा चाराही उपलब्ध नाही. परिणामी तालुक्यातील ९२ हजार ४२७ पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळलेले पशुधन डोळयासमोर उपाशी मरताना पाहण्याचे दुर्भाग्य यंदा बळीराज्याच्या वाट्याला येते की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. २०१३ मध्ये नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असतानाच तालुक्यातील दत्तक ग्राम कामधेनु योजनेचे पशुधन देखील धोक्यात आले आहे. जनावरासाठी चारा उपलब्ध होणे महत्वाचे आहे. अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे जनावरांचा आधारवड समजला जाणारा कडबा काळा पडला. अशा परिस्थितीत कृषी विभागाने ही बाब गांर्भियाने घेतली नाही. या काळात वैरण विकास कार्यक्रम राबविला असता तर जनावरांसाठी पौैष्टिक हिरवा चारा उपलब्ध झाला असता. तुर्तास शेतीपूरक दुग्ध व्यावसाय धोक्यात आला आहे. त्यामुळेच गायी, म्हसी, बैलजोड्या विकण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील हजारो पशुधनाला ६० टक्के वैरण कडबा व त्यासोबत कडब्याच्या कुट्टीतून मिळते. परंतु मागील हंगामात अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ७० टक्के कडबा काळवंडल्यामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैरणीच्या समस्या असताना निकृष्ट वैरणीवर युरिया प्रक्रिया करुन ते पौष्टिक बनविण्यासाठी कुठलेही प्रयत्न कृषी विभागाने केले नसल्याचे शेतकरी सांगतात. पशुसंवर्धन विभाग देखील कुंभकर्णी झोपेत आहे. वैरण विकास कार्यक्रमासोबतच वैरण प्रक्रिया कार्यक्रम राबविला असता तर वैरणाची पौष्टिकता १६ टक्क्यांनी वाढून अधिकतम प्रथिनेयुक्त चारा जनावरांना उपलब्ध झाला असता, असे जानकार सांगतात. जनावरांची प्रकृती सुदृढ राहण्यासाठी व दुभत्या जनावरांपासून अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी तसेच गाई, बैल, म्हशीच्या शरीराची समाधानकारक वाढ होण्यासाठी त्यांचा आहार समतोल असणे महत्वाचे असते, असे डॉक्टर सांगतात. मात्र सध्या हिरवा चाराही नाही अथवा शेतकऱ्यांकडे साठवणूक केलेला कडबाही नाही. परिणामी पशुधन धोक्यात आल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. खरीप २०१४ चा हंगाम आधीच अडचणीत आला आहे. असे असतानाच आता वैरणाची समस्या समोर उभी ठाकल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या रिमझीम पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (वार्ताहर)कामधेनू योजना धोक्यात तालुक्यातील देवगाव (खुं), रोहकल, देऊळगाव, चिंचपूर (खु), आसु, हिगणगांव (खुं), घारगाव, पांढरेवाडी, लोणारवाडी, माणिकनगर अशा नऊ ठिकाणी कामधेनू योजना राबविण्यात येत आहे. शेतीपूरक व्यवसाय करुन दूध उत्पादकाता वाढविणे हा योजनेचा उद्देश आहे.पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत एक गाव समाविष्ट करणे, दुग्ध व्यवसायाच्या सूचना देणे, पशुगणना करणे, पशुपालक मंडळ स्थापन करणे, जंतनाशक शिबीर घेणे, रोगप्रतिबंधक शिबीर, खनिज द्रवे मिश्रण, वैरण विकास प्रकल्प राबविणे इ.कामे केली जातात. त्यामुळे दूध उत्पादकता वाढण्यास मदत झाली. मात्र चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही योजना धोक्यात येणार आहे. काय आहे वैरण विकास कार्यक्रम?पशुधन संगोपनासाठी पनशुधनाची शारीरिक वाढ, प्रजोत्पादन, दुग्ध उत्पादन, आरोग्य संवर्धन, पशुधनापासून अपेक्षित लाभ, पशुसंगोपन व दुग्ध व्यावसाय, आर्थिकदृष्टया किफायतशीर वर्धनक्षम होण्यासाठी सकस, हिरव्या व वाळलेल्या वैरणाची आवश्यकता आहे. यासाठी सुधारित, संकरित व अधिक उत्पादन देणाऱ्या बहुवर्षीय एकदल-द्विदल वैैरण प्रजातीची लागवड करुन वैरण उत्पादन वाढविणे, पशुधनसाठी प्रथिनेयुक्त व सकस आहार उपलब्ध होतो. वैरण विकास कार्यक्रम संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आहे.
९२ हजार ४२७ पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न !
By admin | Updated: July 9, 2014 00:28 IST