जालना : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या ६५ दिवसांमध्ये जिल्ह्यात विविध प्रकारची ८५ कामे पूर्ण झाली असून यासह अन्य सुरू असलेल्या २०२ कामांवर आतापर्यंत २.१४ कोटी रूपये खर्च करण्यात आले आहेत.दुष्काळी परिस्थितीमुळे विविध प्रकल्पातील गाळ लोकसहभागातून काढण्यासह ग्रामीण भागात कंपार्टमेंट बंडिंग, शेततळे, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, विहिर, बोअर पुनर्भरण या प्रकारची कामे अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. या अभियानासाठी २१२ गावे निवडण्यात आलेली आहेत. २६ जानेवारी रोजी या अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ झाला. ३० मार्चपर्यंत या अभियानाच्या माध्यमातून राबवावयाच्या २८७ कामांपैकी ८५ कामे पूर्ण झालेली आहेत. यामध्ये शासकीय मशिनरींसह गाळ काढणे ४ कामे, लोकसहभागातून गाळ काढणे २, कंपार्टमेंट बंडिंग २६, लूज बोल्डर स्ट्रक्चर २, शेततळे २०, सिमेंट नाला बांध ३, माती नाला बांध ९, विहिर पुनर्भरण ४, के.टी. वेअरमध्ये चर खोदणे १३ कामे पूर्ण झाली आहेत. तर २०२ कामे सुरू असून काही कामे सुरू करण्यात येत असल्याचे शासकीय सुत्रांनी सांगितले. या कामांमध्ये सिमेंट नाला बांध कामावर सर्वाधिक म्हणजे १ कोटी ३४ लाखांचा खर्च झालेला आहे. कंपार्टमेंट बंडिंगवर ५१.३० लाख, लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामावर १२ लाख, खोल सलग समतल चराच्या एका कामावर ७ लाख, माती नाला बांधावर २.४० लाख, शासकीय मशिनरींद्वारे गाळ काढण्याच्या कामावर ६ लाख रुपये एवढा खर्च झालेला आहे. कामांची गती आणखी वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील उद्योगपतींनी एकेक गाव दत्तक घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे. शासनाने सुरू केलेल्या या अभियानास ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था यांनीही त्यात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री लोणीकर यांनी केले आहे.या अभियानाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कामांवर जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांचे नियंत्रण असून या कामांसाठी जेसीबी, पोकलॅनची मदत कुणी केल्यास त्यासाठी लागणारे डिझेल इंधन शासनाच्या वतीने देण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी डॉ. एन.आर. शेळके यांनी दिली. मजुरांनाही मागणीप्रमाणे मग्रारोहयोतून कामे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आठही तालुक्यात ६५ दिवसांत ८५ कामे
By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST