लातूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे सोयाबीनचे उत्पन्न घटले असून, परिणामी आडत बाजारातील सोयाबीनची आवकही कमी आहे़ गतवर्षी सोयाबीनच्या विक्रीची १७० टक्के आवक होती़ तर यंदा ६० टक्क्यांवर ही आवक आली आहे़ शिवाय क्विंटलमागे ८० ते १०० रुपये भावही कमी आहे़ सध्या कृषीउत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात ३५ ते ४० हजार क्विंटल सोयाबीनची आवक असून, भाव ३२४० रुपये आहे़ तर वायदा ३२१० निघाला आहे़ एकंदर आवकही कमी आणि भावही कमी अशी परिस्थिती सोयाबीनची झाली. लातूर जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून नगदी पिक म्हणून सोयाबीनकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळले आहेत़ त्याला चांगला भावही मिळत आहे़ त्यामुळे दिवसेंदिवस सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे़ परंतु यंदा कमी पर्जन्यमानामुळे सोयाबीनला फटका बसला आहे़ २० ते २५ टक्के उत्पन्न घटले आहे़ त्यामुळे सध्या आडत बाजारात ६० टक्के आवक आहे़ गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात १७० टक्के सोयाबीनची आवक होती़ यंदा ११० टक्क्याने ही आवक घटली आहे़ सोयाबीन काढणीच्या व राशीच्या वेळी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होत्या़ त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी अद्यापही सोयाबीनची रास केली नाही़ त्यामुळेही आवक कमी आहे़ राशी झाल्यानंतर आवक होईल, अशी शक्यता आडत व्यापारी व्यक्त करीत आहेत़ सध्या ८० ते १०० रुपयाने भाव कमी असला तरी, सोयाबीनला पुढील काही दिवसात गतवर्षी सारखा किंवा त्यापेक्षा अधिक भाव मिळू शकतो़ सध्या रबीच्या पेरण्या नाहीत़ त्यामुळेही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीला काढले नाहीत़ परिणामी आवक कमी आहे़ रबी पेरणीचा खर्च भागविण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री करतात, परंतु यंदा पेरण्या खोळंबल्या असल्याने सोयाबीनची विक्री होत नाही़ बाजार समितीच्या आकडेवाढीनुसार सोयाबीनची मंगळवारी २१ हजार ९९५ क्विंटलची आवक राहिली़ त्याचा कमाल भाव ३४५१ तर किमान ३००० रुपये व सर्वसाधारण भाव ३३२० रुपये होता़ गतवर्षी ३४२० ते ३४५० रुपये होता़ यंदा भावात केवळ ८० ते १०० रुपयाची घट आहे़ उत्पादनात, भावात घट असल्यामुळे तसेच गतवर्षीपेक्षा कमी उत्पन्न झाल्यामुळे आवक कमी आहे, असे आडत व्यापाऱ्यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
गतवर्षीच्या तुलनेत ११० टक्के आवक कमी
By admin | Updated: October 29, 2014 00:45 IST