ब्रह्मपुरी : मेंडकी ग्रामपंचायत अंतर्गत टेकरी रीठ येथील गट नं. ४० व ४३ ही वनविभागाची जागा न्यायालयाच्या आदेशानुसार निवासी उपयोगासाठी सन २००१ पासून कायम करण्यात आली. आज रविवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही माहिती न देता गुलाब गुरनुले यांची झोपडी पाडून त्यांना बेघर केले. वनविभागाच्या या मनमानी कारभारामुळे गुलाब गुरुनुलेंचा संसार उघड्यावर आला आहे.प्राथमिक गरजामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींचा समावेश आहे. त्या सर्वांना मिळाल्या पाहिजे, यासाठी शासन शर्तीचे प्रयत्न करीत असते तर दुसरीकडे वनविभाग मात्र हे सर्व ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने गरिबांना थंडीच्या दिवसात घराला मुकावे लागले आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे लहान मुले, वृद्ध आई व पत्नी यांना घेऊन संसार कुठे थाटायचा, असा प्रश्न गुलाबसमोर निर्माण झाला आहे. टेकरी रीठ येथे वनविभागाची जागा आहे. परंतु जवळजवळ २०० झोपड्या वनविभागाच्या हद्दीत येत असल्याने वेळोवेळी त्यांना अतिक्रमण काढण्याविषयी यापूर्वी सूचित केले होते. संपूर्ण झोपडपट्टीधारकांनी या जागेविषयी न्यायालयात धाव घेतली व २००१ ला न्यायालयाने एकूण गट नंबर पैकी ४० व ४३ गटनंबरची जागा निवासी उपयोगासाठी कायम केली. असे असतानाही वनविभागाने आज सकाळी कोणतीही पूर्वसूचना न देता झोपड्या पाडायला सुरुवात केली. दरम्यान माजी सरपंच व काँग्रेस तालुका सचिव थानेश्वर कायरकर हे घटनास्थळी पोहचले व इतर झोपड्या पाडण्यासाठी मज्जाव केला. तेव्हा कारवाई थांबविण्यात आली. परंतु गुलाब गुरनुले यांची झोपडी पाडल्याने त्याचा संसार उघड्यावर आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वनविभागाच्या मनमानीने गुलाब झाला बेघर !
By admin | Updated: February 1, 2016 00:54 IST