राजुरा : मध्य चांदा वनविभागांतर्गत येत असलेल्या राजुरा वनपरिक्षेत्रात जंगल सफारी सुरू करण्यात येत असून, याकरिता वनविभागाने २८ पर्यटनस्थळे तयार केली आहेत. या माध्यमातून वनविभाग वनपर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न करीत असला तरी या जंगल सफरीला जंगलव्याप्त परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. हा विरोध दर्शविण्यासाठी किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने वन कार्यालयासमोर १८ फेब्रुवारीला एकदिवसीय धरणे आंदोलन केले जाणार आहे.
वनविभाग राजुरा वनपरिक्षेत्रातील अंदाजे १० हजार हेक्टरमध्ये जंगल सफारी सुरू करीत आहे, या वन पर्यटनाकरिता विभागाने जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी २८ पर्यटन स्थळे तयार केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत जंगल सफारी सुरू होणार आहे. या माध्यमातून वन पर्यटनाला चालना देण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहेे; पण या सफारीला जंगलव्याप्त क्षेत्रातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे . या जंगल सफारीमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासावर मोठे प्रशचिन्ह निर्माण होणार आहे. पर्यटक व वाहनांच्या गोंगाटामुळे वन्यप्राणी जंगलाबाहेर येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतपिकांचे नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी या सफरीला विरोध केला आहे. वनविभागाच्या या घातकी निर्णयाविरोधात किसान क्रांती समन्वय समितीच्या वतीने वन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती समितीचे तालुकाप्रमुख प्रदीप बोबडे यांनी दिली.