भाविकांमध्ये उत्साह कायम : ढोलताशे, आतषबाजी नाहीभंडारा : दहा दिवसांच्या अस्सीम भक्तीनंतर सोमवारला गमपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात गणरायाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने बाप्पाच्या विसर्जनावर पावसाचे सावट जाणवत होते. असे असले तरी भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील तीन तलावांसह वैनगंगा नदीत श्रींचे विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्येही मोठ्या भक्तीभावात लाडक्या गणरायांचे विसर्जन झाले. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशोत्सवात जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. प्रश्नमंजुषा, रक्तदान शिबिर, नृत्य, गायन, मनोरंजनात्मक खेळ आदी स्पर्धांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात आले. यात लहाणांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी हिरीरीने भाग घेतला. भंडारा जिल्ह्यात यावर्षी ५२३ ठिकाणी सार्वजनिक गणरायांची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. तसेच १२२ ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. यासाठी जिल्हाभरात ४०० पेक्षा जास्त पोलीस व होमगार्ड सैनिकांचा ताफा सुरक्षा व्यवस्थेत लावण्यात आला होता. दरम्यान गणरायांचे विसर्जन दि.१२ सप्टेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. यात भंडाराचा राजा १० सप्टेंबर रोजी तर गणेशपूरच्या राजाचे १२ सप्टेंबर रोजी विसर्जीत करण्यात येणार आहे.दरम्यान, सोमवारी सकाळपासूनच घरगुती गणरायांच्या विसर्जनाला प्रारंभ झाल्याचे दिसले. पावसाची हजेरी दिवसभर असल्याने गणरायांच्या विसर्जनावर त्याचे सावट स्पष्ट झळकले. पावसामुळे फटाक्यांची आतषबाजी झालीच नाही. ढोलताशांचा गजरही कमी प्रमाणात ऐकू आला. (प्रतिनिधी)
विसर्जनावर पावसाचे सावट
By admin | Updated: September 9, 2014 00:09 IST