आमगाव/दिघोरी : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे धान उत्पादकांसाठी जाहीर केलेली नुकसान भरपाईपासून परिसरातील अनेक शेतकरी वंचित असून अद्याप पर्यंत शेतकऱ्याना ती मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.मागील वर्षी अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांचे धानपिके पाण्याखाली सडले होते. अनेकांची शेती पडित राहली होती. यामुळे शासनाने प्रति हेक्टर ७५०० रूपये नुकसान भरपाई जाहिर केली होती. त्यानुसार ही भरपाई प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार होती. ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली बँक खाती तलाठ्याकडे जमा केली. मात्र अजूनपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम अजूनपर्यं जमा झाली नाही.अनेकांनी याबाबत तलाठी कार्यालयामध्ये चकरा मारल्या मात्र तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांची माहिती पाठविली आहे. खात्यामध्ये ती भरपाई जमा होणार, असे सांगून शेतकऱ्याला परत पाठविल्या जाते. शेतकरी बँकेमध्ये पैसे जमा झाले का हे पाहण्यासाठी जातात मात्र नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे बँकेकडून सांगितल्यावर शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे. आमगाव येथील रामाजी शिंगनजुडे या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अजूनपर्यंत जमा झाली नाही. असे कित्येक शेतकरी गावामध्ये असल्याचे समजते. शासनाने घोषणा करून वर्ष लोटला मात्र भरपाई मिळाली नसल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे.(वार्ताहर)
नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित
By admin | Updated: November 16, 2014 22:45 IST