शिरूर कासार : एकाच दिवशी तीस शेळ्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्या असल्याची घटना तीन चार दिवसांपूर्वी घडली. अखेर बुधवारी शिरूर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यानच्या काळात शेतात काम करत असताना उभी केलेली एक दुचाकीदेखील गायब झाल्याचा तक्रार अर्ज शेतकऱ्यांनी पोलिसांकडे दिला आहे.
शनिवार ३ रोजी दुपारी शेळ्या शेतात चरत असताना माझ्या दोन शेळ्या किंमत अंदाजे रुपये तीस हजार अज्ञात चोरट्यांनी अकरा ते चारच्या दरम्यान नेल्या असल्याची फिर्याद शेख शौकत रमजान यांनी ६ जुलै रोजी पोलीस ठाण्यात दिली. त्यातच शेख सरोवर ईस्माईल यांच्या ४, शेख महंमद २, शेख फेरोज गफुर ६, सय्यद रफिक ४, शेख जाकिर बादशहा, शेख शकिल जावेद, शेख जावेद बबन यांच्या प्रत्येकी एक, असिम पठाण ६ तर शेख ताजू यांच्या तीन शेळ्या अशा सुमारे ३० शेळ्या पळविल्या असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
शेळ्या पळविल्यानंतर एक दिवस उलटला. ५ रोजी कोळवाडी येथील बाळासाहेब दशरथ शिरसाट यांनी आपली दुचाकी (क्र. एम. एच. १६, ए. के. २०५६) ही लाॅक करून शेतकाम करण्यासाठी गेले. परत जातेवेळी गाडी जागेवर नसल्याचे दिसून आले. विचारपूस व शोधाशोध करून देखील गाडी सापडली नसल्याचा तक्रारी अर्ज बाळासाहेब शिरसाट यांनी पोलीस स्टेशनला दिला आहे. एकाच आठवड्यात शेळ्या व दुचाकी प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेळ्या चोरी प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत सानप हे करत आहेत.