आष्टी : तालुक्यातील किन्ही येथील ट्रान्स्फॉर्मर एक महिन्यापासून नादुरुस्त असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे. तरी वीजपुरवठा तातडीने सुरू करावा; अन्यथा महावितरण कार्यालयासमोर दोन दिवसांत उपोषण करण्याचा इशारा सरपंच राहुल काकडे यांनी उपअभियंत्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.
किन्ही येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर एक महिन्यापासून नादुरुस्त आहे. याबाबत अनेक वेळा महावितरणला सांगूनही ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला नाही. यामुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मोबाइल चार्ज होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. तरी येथील वीजपुरवठा तातडीने सुरळीत करावा, अशी मागणी सरपंच काकडे यांनी केली आहे.