माजलगाव : येथील श्री सिद्धेश्वर महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्सव व लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय कोकड, प्राचार्य डॉ. महेश देशमुख, प्रमुख वक्ते प्रा. सुरेशचंद्र नेळगे, उपप्राचार्य डॉ. गजानन होन्ना, प्रा. युवराज मुळये, प्रा. संतोष लिंबकर यांची उपस्थिती होती.
प्रमुख वक्ते प्रा. सुरेशचंद्र नेळगे म्हणाले, निसर्ग आपला मुख्य गुरू आहे. त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. तसे तर प्रत्येक मनुष्याची पहिली गुरू आई असते. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे बाळकडू राजमाता जिजाऊंकडून घेतले. भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून आपण यातून त्याग व समर्पण शिकलो आहोत, असेही ते म्हणाले.
प्राचार्य डॉ. महेश देशमुख यांनी श्री दत्तगुरूंनी निसर्गाकडून ज्ञान घेताना चोवीस गुरू कसे केले हे सांगितले. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांची भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कामगिरी प्रमुख आणि महत्त्वाची होती असे सांगितले. अध्यक्षीय समारोप अभय कोकड यांनी केला. प्रास्ताविक डॉ. कमलकिशोर लड्डा यांनी केले. वैयक्तिक पद्य डॉ. साधना घडसिंग यांनी सादर केले. सूत्रसंचालन प्रा. प्रतिभा जाधव यांनी केले. प्रा. प्रीती कळसणे यांनी आभार मानले.