तिवसा : दोन वर्षांपूर्वी झालेल्या लग्नाची माहिती लपवून दुसरे लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरूणाचा प्रताप साक्षगंधानंतर उघडकीस आला. त्याच्या पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून याप्रकरणी विवाहित युवकासह त्याच्या कुटुंबातील ११ व्यक्तींवर तिवसा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी युवकाचे वडील, काका आणि भाऊ पोलीस खात्याचे कर्मचारी आहेत, हे विशेष. अकोला जिल्ह्यातील बार्शी (टाकळी) येथील राहुल ऊर्फ अमोल रामदास केदारे याचे पहिले लग्न १२ सप्टेंबर २०१२ रोजी सुरेखा ठाकूर या युवतीसोबत झाले होते. याची माहिती त्याने व त्याच्या कुटुंबाने दडवून ठेवली. आणि तिवसा येथील रमेश गोफणे यांच्या मुलीसोबत दुसरे लग्न करण्याचा घाट घातला. १४ मार्च २०१४ रोजी साक्षगंधसुद्धा केले. दुसर्या लग्नाची कुणकुण लागताच राहुलच्या पहिल्या पत्नीने गोफणे कुटुंबासोबत संपर्क साधला. त्यानंतर गोफणे कुटुंबाने केलेल्या चौकशीत केदारे कुटुंबाने फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. रमेश गोफणे यांनी तिवसा ठाण्यात तक्रार नोंदविली. याप्रकरणी राहुल रामदास केदारे, रामदास किसनराव केदारे, तात्या केदारे, माणिकराव केदारे, प्रशांत रामदास केदारे, वाघमारे, सुखदेवराव सुळके, रामकृष्ण ताकपीरे, गणेशराव पोदाडे, अनंतराव केदारे व प्रतिभा वाघमारे यांच्यावर भादंविचे कलम ४२०, ३४ अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. (शहर प्रतिनिधी)
दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणे भोवले !
By admin | Updated: May 10, 2014 02:28 IST