शासकीय रक्तपेढीत ८५०, खासगीमध्ये १४०० रुपये दर
वैभव बाबरेकर - अमरावती
प्रत्येकाला देशाच्या सीमेवर जाऊन लढणे शक्य नसते. परंतु रक्तदानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती देशसेवा करू शकते. रक्तदान हे जीवनदान आहे. मात्र, रक्तदानाच्या माध्यमातून मिळणारे जीवनदान आता महागणार आहे. गरजवंतांना रक्तासाठी आगाऊ पैसे मोजावे लागणार आहेत. रक्ताच्या दरवाढीचा निर्णय राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. रक्ताचे दर वाढल्यास रक्ताच्या एका पिशवीकरिता शासकीय रक्तपेढीत ८५० तर खासगी रक्तपेढ्यांमध्ये १४०० रुपये मोजावे लागतील. अमरावती जिल्हा रक्तदान चळवळीत अधिक सक्रिय आहे. रक्तदान शिबिरांमार्फत जिल्ह्यात दररोज हजारो दाते रक्तदान करीत असतात. या शिबिरांमधून संकलित केलेले रक्त जिल्ह्यासह अन्य काही शहरामध्ये पाठविले जाते. त्यामुळे दररोज शेकडो रूग्णांचे प्राण वाचतात. अपघातात जखमी, गंभीर आजारी रुग्ण, सिकलसेल या सारख्या गंभीर रक्तसंक्रमणाच्या आजाराने बाधित रुग्णांना दररोज रक्तपुरवठा करावा लागतो. शासकीय व खासगी रक्तपेढींमार्फत हा रक्त पुरवठा केला जातो. शासकीय रक्तपेढीत एका रक्त पिशवीकरिता ४२५ रुपयेप्रमाणे मूल्य आकारण्यात येते.