ई-बुक्समध्ये रूपांतरअमरावती : शालेय शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासोबतच पाठय़पुस्तकातील धडे लगेचच अवगत होण्याच्या दृष्टिकोनातून शालेय अभ्यासक्रमातील पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ईबुक्स स्वरूपात प्रकाशित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य पाठपुस्तक संशोधन आणि निर्मिती मंडळाच्या बालभारतीच्या अभ्यासक्रमात यावर्षी ई-तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याने पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण मनोरंजक होणार आहे.सध्या आरटीई व आरटीआय या नियमांची अंमलबजावणी शिक्षण विभागात चालू आहे.या अंतर्गत शिक्षकांना विविध प्रकारची प्रकाशने देण्यात येत आहेत. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया प्रभावी होण्यासाठी ई स्कूलची निर्मिती करण्यात आली.काही जिल्ह्यांतील काही शाळांमध्ये ई स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान केले जात आहे. यापूर्वी विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या उपक्रमातील मिळालेली फलश्रृती लक्षात घेता शालेय शिक्षण विभाग व शासनाने पहिली ते आठवीपर्यंतची सर्व पुस्तके ई बुक्स स्वरूपात तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.बदललेल्या नवीन अभ्यासक्रमानुसार तयार झालेल्या पाठय़पुस्तकांचे रूपांतर ई बुक्समध्ये केले जात आहे.पाठय़पुस्तकातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अवगत व्हावे यासाठी पाठांना पूरक असे ध्वनीचित्रफिती देण्यात आले आहे.पुस्तकातील कथा अँनिमेशनमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी, शिक्षण रंजक संवादात्मक आणि मनोरंजक व्हावे तसेच शिक्षणामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढावा हा या उपक्रमाचा हेतू आहे. हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविला जाणार आहे.(प्रतिनिधी)
पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण होणार मनोरंजक
By admin | Updated: May 9, 2014 01:00 IST