पोलीस ठाण्यातील नोंदवह्या धूळ खात
प्रसन्न दुचक्के - अमरावती
शहरात गेल्याकाही दिवसांपासून परप्रांतीय मुसाफिरांचा मुक्तसंचार वाढला आहे. भटक्या टोळ्यांच्या (मुसाफिर) नोंदी ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस ठाण्यांमधील नोंद वहीत या मुसाफिरांची नोंदच घेतली जात नसल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत पुढे आले आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून दरोडा, चोर्या, घरफोड्या, चेन स्नॅचिंगच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही काळापासून शहरात मुसाफिरांचा मुक्तसंचारही वाढला आहे. कुठलीही परप्रांतीय व्यक्ती शहरात व्यवसायासाठी दाखल झाल्यास त्याला नियमानुसार संबंधित पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंद वहीत स्वत:च्या नावाची नोंद करावी लागते. या नोंदवहीत परप्रांतीयांची नोंद करण्याची जबाबदारी जेवढी मुसाफिरांची आहे तेवढीच पोलिसांचीही आहे. परंतु पोलीस ही जबाबदारी योग्य पध्दतीने पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. नोंदवहीत नावे नोंदविताना पोलीस मुसाफिरांकडून एक फॉर्म भरुन घेतात. फॉर्म भरताना त्यांच्याकडील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र व फोटो आयडीच्या झेरॉक्स प्रतींची मागणी पोलिसांनी करणे गरजेचे असते. मुसाफिरांचा फॉर्म भरुन घेतल्यानंतर संबंधित मुसाफिराबद्दल तो मूळ रहिवासी असलेल्या पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शहरातील काही पोलीस ठाण्यातील मुसाफीर नोंदवह्यांमध्ये परप्रातीयांच्या नोंदी घेणे बंद झाले आहे. या नोंदवह्या पोलीस ठाण्यांमध्ये धूूळखात पडलेल्या आहेत. पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा वार्र्षिक आढावा घेताना या मुसाफीर नोंद वहीचा आढावा घेणे आवश्यक असते. मात्र, वरिष्ठ अधिकार्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.