आर्थिक संकट झाले गहिरे : मशागतीसाठी पैसा आणायचा कोठून?अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील शेतकरी गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे संकटात असताना यंदा दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्याने तालुक्यातील एका पिता-पुत्राने स्वत:च मशागत सुरु केली आहे.यंदा जून महिन्यात आठ दिवस दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन महागडे बी घेऊन पेरणी केली. पेरणीवर एक महिना उलटला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. रान कोरडे पडल्यामुळे मजूर वर्गावर सुध्दा उपासमारीची पाळी आली आहे. पेरलेले बियाणे उगवण्याकरिता पाण्याची गरज असते. मात्र, पाऊसच नसल्याने आपल्या शेतातील पीक करपू नये यासाठी बैलबंडीने पाणी आणून लोट्याने पिकांना पाणी दिले जात आहे. हे कामही शेतकरी स्वत:च करीत आहेत. शेतात पेरल्यानंतर उगवलेल्या थोड्याफार पिकांवरच संसाराचा गाडा चालविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कसेबसे पीक हाती यावे, यासाठी पिकाला डवरणीची गरज असते. परंतु डवरणीसाठी पैसाच नसल्याने करण्याकरिता शेतकऱ्याजवळ पैसा नसल्यामुळे तालुक्यातील शेतकरी पिता-पुत्र स्वत: डवरणी करीत आहेत. अशी भीषण परिस्थिती यावर्षी अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांवर आलेली आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपत आहेत. वातावरणात वरुन उन्हाचा ताप व हवा ह्यांचे प्रमाण ह्याचा सर्व परिणाम शेतकऱ्यांवर तर होत आहेच परंतु ज्या शेतीच्या भरवश्यावर आपला उदर निर्वाह चालवणा मजुर वर्ग आहे त्याच्यावर आणि व्यापाऱ्यांवरही याचा फार मोठा परिणाम होत आहे. मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे ह्या भागात चोरीचे प्रमाणसुध्दा वाढत आहे.बँकेमार्फत कर्जवाटपाचे शासनाकडून आदेश असतानासुध्दा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही. शासनाची पुनर्गठनाची योजना थंडबस्त्यात पडली आहे. निदान कर्जाचे पुनर्गठन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. एकीकडे बँकांकडून होणारा असहकार आणि दुसरीकडे कोरड्या दुष्काळाच्या सावटामुळे पुढे उभे ठाकलेले संकट यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा शेतांची मशागत करावी लागणार आहे. परंतु त्यासाठी पैसाच नसल्याने शेतकरी स्वत: कष्ट करण्यावर भर देत असल्याचे चित्र आहे.
दुबार पेरणीसाठी पिता-पुत्रच करताहेत मशागत
By admin | Updated: July 16, 2015 00:28 IST