संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेजाऱ्याकडून अनधिकृतपणे वीज घेतली तरी ती चोरी ठरते. घरागुती वापराची वीज दुकानासाठी वापरली जात असेल, तर तोही गुन्हा ठरतो. जिल्ह्यात आतापर्यंत वर्षभरात १८६८ जणांवर वीज चोरीची कारवाई करण्यात आली आहे. वीजवापराबाबत नकळत होणाऱ्या चुकांमुळे महावितरणकडून कारवाई होऊ शकते. अशा वीजचोरीबाबत प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये आर्थिक दंडासह काही वेळेला प्रकरणे पोलिसांत देण्यात आली आहे. अशा प्रकरणांमध्ये वीजचोरीच्या दहापटदेखील दंड वसूल केला जाऊ शकतो. अशा कारवाईपासून वाचण्यासाठी कुणीही विद्युत नियमांचे उल्लघंन करू नये. वीज वापर कायदेशीर जेवढा होऊ शकेल, तेवढेच देयक भरावे आणि आत्मसन्मानाने जगावे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चोरी कळवा, १० टक्के रक्कम बक्षीस मिळवाजर एखाद्या नागरिकाने त्याला माहिती असणाऱ्या व्यक्तीची वीजचोरी पकडून दिली, तर त्याला वीजचोरीच्या दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस स्वरूपात दिली जात असल्याची माहिती महावितरणने दिली. मात्र, त्या व्यक्तीला वीज चोरीचा फोटो काढून महावितरणच्या अधिकृत संकेत स्थळावर अपलोड करावा लागतो. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.
कायदा काय सांगतो?विद्युत कायदा २००३ मधील कलम १२६ अंतर्गत जर महावितरणने एखाद्या ग्राहकाचा विद्युत पुरवठा खंडित केला असेल, तर त्याने शेजाऱ्याकडून वीज घेणे गुन्हा ठरतो. असे आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. ज्या कामासाठी वीज घेतली आहे, त्याचा वापर त्या कामासाठी न करता दुसऱ्या कामासाठी केला असेल, तर कारवाई केली जाते. मात्र, यामध्ये येथे एफआयआर दाखल करण्यात येत नाही.
शेजाऱ्याकडून वीज घेणे किंवा वीजेचा वापर अन्य कारणासाठी करणे गुन्हा ठरतो. आमचे भरारी पथक आहे. ते कारवाई करतात. डिव्हिजननुसार पथके कारवाईसाठी सज्ज आहेत. - पुष्पा चव्हाण मुख्य अभियंता महावितरण अमरावती