चांदूरबाजार : जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाला मंगळवारपासून प्रारंभ झाला असला तरी कडधान्य पेरणीचा काळ निघून गेल्याने पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उशिरा आलेल्या पावसाचा फटका फळबागांनाही बसला आहे.शासनाने शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी अल्पावधीत व रोखीचे पीक म्हणून सोयाबीनची पसंती केली. मात्र या पिवळ्या सोन्यालाही पावसाअभावी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन हे ९० दिवसांचे पीक आहे. कमाल १५ जुलैपर्यंत सोयाबीनचे पीक जमिनीत पडले पाहिजे. त्यानंतर पेरल्या गेलेल्या सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ सोयाबीनचे महागडे बियाणे असूनही ते आता पेरणी करु शकणार नाहीत. मृगात सोयाबीनची पेरणी झाल्यावर जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला पूरक पाऊस व हवामान मिळत असते. त्यानंतरच या पिकाचा भरघोस उत्पन्नाची हमी असते. हा अनुभव शेतकऱ्यांना गेल्या वर्षांच्या सोयाबीन उत्पन्नातून आला. नेत्यांना मात्र विधानसभा निवडणुकीचे वेधएकीकडे बळीराजा पावसाच्या एकाएक थेंबासाठी तरसतो आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षांची नेते आपली विधानसभेची ‘फिल्डींग’ लावण्यात व्यस्त असल्याचे दिसते. देशाला श्रीमंत व जिवंत ठेवणारा बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जगात असा कोणताच वर्ग, व्यवसाय, क्षेत्र नाही की जे एका बियाणापासून कोट्यवधी बियाण्याची उत्पादन करते. ज्यातून तो स्वत:ची व इतरांच्या पोटाची खळगी भरत असेल. परंतु शेती व्यवसायातून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. इतर वेळी आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाचे सात्वन करण्यासाठी जाणारे नेते आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा तरी देणार आहेत का? ही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.
कडधान्याची पिके गेली, फळबागालाही फटका
By admin | Updated: July 15, 2014 23:54 IST