संजय जेवडे - नांदगाव खंडेश्वर
फेब्रुवारी व मार्च या कालावधीत अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पीक व फळबागांचे नुकसान झालेल्या आपाद्ग्रस्त शेतकर्यांना शासनाच्या विशेष पॅकेजव्दारे कृषिपंपांच्या ६ महिन्यांच्या वीज बिलात सूट देण्यात येणार आहे. या बाधित शेतकर्यांनी जानेवारी ते जून २०१४ या कालावधीतील वीज बिल देयके राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने हालचाली सुरु असून बाधित शेतकर्यांचा महसूल यादीतील नावे व त्यांचा वीजग्राहक क्रमांक व जानेवारी ते मार्चचे वीज देयकाची रक्कम याबाबत वीज कंपनीने माहिती संकलीत केली आहे. या माहितीच्या आधारे शासनाचे सवलतीचा लाभ वीज देयकात शेतकर्यांना देण्यात येत आहे. सहायक अभियंता वीज वितरण कंपनी उपविभाग नांदगाव खंडेश्वर या कार्यालयाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ८५ गावे येत असून तीन हजार ७५२ कृषीपंपधारक शेतकरी आहेत. तसेच बडनेरा कार्यालयाअंतर्गत ७६ गावांचा समावेश असून सुमारे ४ हजारांच्या वर कृषीपंपधारक शेतकरी आहेत. या गारपीटग्रस्त शेतकर्यांची यादी महसूल विभागाकडून प्राप्त करुन वीज वितरण कंपनीने या शेतकर्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या बिलात सवलतीचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १४८ गावांतील १३ हजार ६०४ शेतकर्यांच्या शेतातील पिके व फळबागांतील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. या तालुक्यात ५ हजार ३८६ हेक्टर हरभरा, ४ हजार २४६ हेक्टर गहू, ५९८ हेक्टर संत्रा, २९ हेक्टर लिंबू व ३४० हेक्टर भाजीपाला, तीळ व मका आदी पिके ५० टक्क्याचेवर नुकसान झाले होते. या गारपीटग्रस्त शेतकर्यांना शासनाच्या विशेष पॅकेजव्दारे जानेवारी ते जून २०१४ या कालावधीत कृषिपंपाच्या वीज देयकात सूट देण्यात येणार आहे. शासनाने शेतकर्यांसाठी घेतलेल्या हिताच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.