शिर्डी : पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या भाविकांचा शुक्रवारी दिवसभर व्यक्त होणारा रोष बघून पाण्याची बाटली संवेदनशील व धोकादायक नसून जीवनावश्यक असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़ यामुळे रात्री याप्रश्नी यू टर्न घेत मंदिरात पाण्याच्या बाटल्या नेण्यावरील बंदी हटविण्यात आली़ याबरोबरच याप्रश्नी दोषी धरुन निलंबित करण्यात आलेल्या तेरा कर्मचाऱ्यांवरील कारवाईही आपोआप संपुष्टात आली़मंदिरातील रिकाम्या बाटल्या बघून स्वच्छतेच्या कारणास्तव आपण सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या़ मात्र त्याचा वेगळाच अर्थ घेऊन संबंधितांनी थेट पाण्याच्या बाटल्यावरच बंदी आणली़ शुक्रवारी ही बाब समोर आल्याने आपण प्रत्यक्ष पहाणी करुन हा प्रकार तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले़याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे संस्थानचे कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ यावेळी उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब साबळे, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते़गैरसमज व समन्वयाच्या अभावातून झालेल्या या प्रकारामुळे भाविकांना गेले दोन दिवस जो त्रास झाला त्याबद्दलही सोनवणे यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे़ ज्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या जमा करण्यात येत होत्या, तेथे आता स्वच्छेतेच्या कारणास्तव केवळ रिकाम्या बाटल्या जमा करण्यात येतील, असेही सोनवणे यांनी स्पष्ट केले़ गेल्या दोन दिवसांपासून मंदिरात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी आणण्यात आली होती़ मंदिरात बाटल्या आढळल्याने तेरा कर्मचाऱ्यांना आठ दिवसांसाठी निलंबितही करण्यात आले होते़ ‘लोकमत’ने या विषयाला आज वाचा फोडली़ भाविकांनीही दिवसभर या निर्णया विरोधात आक्रोश व्यक्त केला़ परिणामी रात्री नऊच्या सुमारास प्रशासनाने यू टर्न घेत या अन्यायकारक निर्णयाला मुठमाती दिली़ (वार्ताहर)
साईसंस्थानचा ‘यू टर्न’
By admin | Updated: June 21, 2014 00:45 IST