यावेळी शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषयतज्ज्ञ संजय पाटील, जलतज्ज्ञ रामनाथ नवले, विभागीय अधिकारी जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले, एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय राजूरचे निरीक्षक गंगाराम करवर व श्याम कांबळे उपस्थित होते.
प्रकल्पांतर्गत येणाऱ्या १३ गावांमधून पारंपरिक बीज संवर्धन करणाऱ्या महिलांना कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. प्रदर्शनात आदिवासी भागातील जंगलामध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध ८५ प्रकारच्या जंगली भाज्या, बनवलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. यात प्रामुख्याने चीचुर्डा, भारंगी, आळवड, भोकर, दोडकी, पंधा, बर्की, तेरा, मेक, चाई, फांदी, कौला, चितरुक, बांबू भाजी, कुर्डू, अंबाडी, दिवा, पडदा, करंदा, केना, घोळू अशा विविध प्रकारच्या भाज्या मांडण्यात आल्या होत्या. संजय पाटील यांनी रानभाज्या आणि त्यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
प्रास्ताविक विभाग प्रमुख जितीन साठे यांनी केले. योगेश नवले, रामकृष्ण भांगरे, खंडू भांगरे, आनंदा घोलवड, मयूर रहाणे, विवेक दातीर, अश्विनी हासे, देवराम भांगरे यांनी योगदान दिले.