उत्तरेतील श्रीरामपूर, राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले, नेवासा तसेच राहुरीच्या काही भागांमध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात यंदा काहीशी वाढ होणार आहे. मागील वर्षी सोयाबीनला प्रथमच सात हजार रुपये क्विंटलपर्यंत उच्चांकी भाव मिळाल्याने शेतकरी समाधानी आहेत. त्यामुळे कृषी विभागाने यंदा विशेष मोहीम राबवत शेतकऱ्यांना बाजारातील बियाण्यांऐवजी घरी जतन केलेल्या बियाणाची लागवड करण्याकरिता प्रेरित केले आहे. सुमारे ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास विभागाने व्यक्त केला आहे.
श्रीरामपूर उपविभागीय कृषी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या श्रीरामपूर, राहुरी, नेवासे व शेवगाव तालुक्यात शेतकऱ्यांना २० हजार क्विंटल बियाण्यांची आवश्यकता भासणार आहे. मात्र कृषी विभागाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १२ हजार क्विंटल बियाणे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे समोर आले. त्यामुळे केवळ आठ हजार क्विंटल बियाणे हे कृषी केंद्रांकडून खरेदी करावे लागेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध असेल तर त्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही. मात्र अन्य शेतकऱ्यांनी किमान शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे उपविभागीय कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी लोकमतला सांगितले.
------
सोयाबीनचे अंदाजित क्षेत्र
श्रीरामपूर : १२ हजार हेक्टर
कोपरगाव : २१ हजार हेक्टर
संगमनेर : ११ हजार हेक्टर
राहाता : १६ हजार हेक्टर
अकोले : १० हजार हेक्टर
नेवासे : ६ हजार हेक्टर
राहुरी : ४ हजार हेक्टर
शेवगाव : २५० हेक्टर
----
सोयाबीन हे स्वयंपराग सिंचित व सरळ वाणाचे पीक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचे बियाणे किमान दोन-तीन वर्षे वापरण्यास काहीच हरकत नाही. त्यानंतरच बाजारातून बियाणे खरेदी करावे. पेरणीपूर्वी बियाण्यांवर बुरशीनाशकांचा वापर करावा.
- संजय काचोळे, उपविभागीय कृषी अधिकारी, श्रीरामपूर
-----