अहमदनगर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा अंतर्गत पदांसाठी शनिवारी जिल्ह्यातील ६० केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला सहा हजार उमेदवारांनी दांडी मारली. कोणताही गोंधळ न होता शांततेत परीक्षा झाली. विशेष म्हणजे उमेदवारांना प्रश्नपत्रिका सोबत हॅण्डग्लोज, सॉनिटायझर व मास्क असलेले एक किट देण्यात आले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दुय्यम सेवा अराजपत्रित गट ‘ब’ साठी शनिवारी संयुक्त परीक्षा झाली. राज्य कर निरीक्षक (एसटीआय), पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) आणि एएसओ (असिस्टंट सेक्शन ऑफिसर, मंत्रालय) या तीन पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १९ हजार १४७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १२ हजार ५४९ उमेदवारांनी शनिवारी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्या ६ हजार ५९८ जणांनी परीक्षेला दांडी मारली.
परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परीक्षा सुरळीत आणि कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत पार पडली, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षेचे केंद्र प्रमुख संदीप निचित यांनी सांगितले.
सकाळी ११ ते दुपारी १२ अशी एक तासाची परीक्षेची वेळ होती. कोरोना नियमांचे पालन करून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेला प्रवेश करताना उमदेवारांच्या हातात एक किट देण्यात आले होते. त्यामध्ये सॉनिटायझरची पाऊच, हॅण्ड ग्लोज, एक मास्क देण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावेळी विशेष दक्षता घेण्यात आली होती.
---------
प्रशासन, पोलिसांचा बंदोबस्त
नगर शहर व शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील ६० उपकेंद्रावर या परीक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला होता. परीक्षेसाठी १५ समन्वय अधिकारी, ३ भरारी पथके, ६० सहायक, १८७ पर्यवेक्षक, ७९ सहायक, ७९८ समवेक्षक, ६० लिपिक, ६० शिपाई, १९६ पाणी वाटप कर्मचारी, ७८ वाहनधारक, ५३ केअर टेकर, ५३ बेलमन असे १७०० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते.
-------
फोटो- ०४ एमपीएससी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दुय्यम सेवा पदांसाठी शनिवारी नगर शहरातील शाळा, महाविद्यालयात परीक्षा झाली. परीक्षा देऊन बाहेर पडलेले उमेदवार. (छायाचित्र- साजिद शेख)