अहमदनगर : गत महिन्यात जिल्ह्यात झालेला पाऊस हा सरासरीच्या ६० ते ६५ टक्के इतकाच होता. मात्र गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील पावसाची टक्केवारी ९१ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. त्यात चार तालुक्यांमधील पाऊस सरासरीच्या ९० टक्के इतका झाला आहे, तर दक्षिण भागातील पारनेर, जामखेड आणि कर्जत या तीन तालुक्यांमधील पावसाची टक्केवारी सरासरीच्या ७५ टक्के इतकी आहे. सर्वाधिक पाऊस शेवगाव व पाथर्डी तालुक्यात असून पावसाची ही टक्केवारी सव्वाशे टक्के आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गत आठवड्यात जिल्ह्यातील दक्षिण भागात अतिवृष्टी झाली. नदी, नाल्यांना पूर आले. जनावरे वाहून गेली. नगर, शेवगाव, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात झालेला एकूण पाऊस ९१ टक्के इतका झाला आहे. गतवर्षी ५ सप्टेंबरपर्यंत १६७ टक्के इतका पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे दिसले.
शनिवारी जिल्ह्यात पावसाला पुन्हा सुरुवात झाली. पुन्हा शेवगाव, पाथर्डी, नगर या तीन तालुक्यांत पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. बीड-अहमदनगर या दोन्ही जिल्ह्यांच्या भागात मोठा पाऊस झाल्याने जामखेड तालुक्यातील नद्या-नाल्यांनाही पूर आला. शनिवारी नगर (३२.२), पारनेर (१७.७), श्रीगोंदा (३२.४), कर्जत (२८.८), जामखेड (३३.६), शेवगाव (५२.८), पाथर्डी (५८.१), नेवासा (३३.४), राहुरी (१५.६), संगमनेर (७.३), अकोले (६.५), कोपरगाव (५३.), श्रीरामपूर (१४.५), राहाता (८.०). असा एकूण सरासरी २४.६ मि.मि. इतका पाऊस झाला.
जिल्ह्याची पावसाची सरासरी ही ४४८ मि.मी. इतकी आहे. यंदा आतापर्यंत ४०९ मि.मि. इतका पाऊस झाला आहे. ही टक्केवारी सरासरीच्या ९१ टक्के इतकी आहे. गतवर्षी याचवेळी सरासरीच्या १६७ टक्के इतका पाऊस झाला होता.
------------
आतापर्यंत झालेला पाऊस (सरासरीच्या टक्के)
तालुका टक्के
अहमदनगर ८८.५
पारनेर ७४.१
कर्जत ७६.५
जामखेड ७७.३
शेवगाव १११.६
पाथर्डी १३४.९
नेवासा ८९.२
राहुरी ९१.१
संगमनेर ८०.९
अकोले ११२.५
कोपरगाव ९९.९
श्रीरामपूर ९२.३
राहाता ७३.०
एकूण ९१.३
---------------------
अतिवृष्टीचा पुन्हा इशारा
५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत गटगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात सर्वदूर पावसाचा इशारा दिला आहे. नगर जिल्ह्यात ५, ६ आणि ७ सप्टेंबरला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.