अहमदनगर : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हिरडगाव (ता. श्रीगोंदा) येथील ‘साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज’ या साखर कारखान्याकडील ३८३ कोटींच्या वसुलीचा प्रस्ताव पंजाब नॅशनल बँकेने त्रुटी दुरुस्ती करून नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी त्यास अधिकृत दुजोरा दिला आहे. २०१२ ला पंजाब नॅशनल बँक (कल्याणीनगर), आंध्र बँक व बँक आॅफ बडोदा या बँकांनी त्यांच्या पुणे येथील शाखेतून साईकृपा कारखान्याला २७८ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यात पंजाब नॅशनल बँक या प्रकरणी अग्रणी बँकेची भूमिका बजावत होती. या कर्जाची व्याजासह परत फे ड रक्कम ३८३ कोटी रुपये झाली आहे. या रकमेच्या वसुलीसाठी बँकेने कायदेशीररित्या नोटिसा पाठवून थकबाकी भरण्यास सुचविले. पण त्यास कारखाना व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेने सिक्युरीटायझेशन अॅक्टनुसार थकबाकी वसुलीसाठी बँकेविरोधात कायदेशीर लढाई सुरू केली. त्यानंतर कारखान्याने थकबाकी न भरल्याने बँकेने प्रतिकात्मक स्वरुपात जप्तीची कारवाई केल्याचे सांगण्यात येते. बँकेने कारखाना जप्तीसाठी सिक्युरीटायझेशन अॅक्टनुसार अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काही दिवसांपूर्वीच प्रस्ताव सादर केला. त्यात काही त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे तो प्रस्ताव परत पाठविण्यात आला होता. जिल्हा प्रशासनाने त्या त्रुटीसंदर्भात बँकेला पत्र पाठविले होते. त्यानुसार बँकेने जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या त्रुटी दूर करून पुन्हा प्रस्ताव सादर केला. त्याची छाननी होऊन तो जिल्हाधिकाऱ्यांसमोर गेल्यानंतर महसूल विभागामार्फत पुढील कार्यवाही होणार आहे. (प्रतिनिधी) ........................... बँकेने ‘साईकृपा’बाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यात काही त्रुटी होत्या. या त्रुटी दूर करुन नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याची छाननी होऊन तो जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात येणार आहे. - राजेंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी, अहमदनगर ...............
पाचपुतेंच्या साखर कारखान्याच्या जप्तीचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2016 00:56 IST