कुळधरण : कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील तलाठी कार्यालय गुरुवारपासून बंद असल्याने शनिवारी शेतकऱ्यांनी निदर्शने केली. ठराविक शेतकऱ्यांची कामे होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी तलाठ्याला धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी घडली. अनेक गावांचा कारभार असल्याचे सांगत तलाठी अनारसे नियमित कार्यालय उघडत नसल्याच्या तक्रारी होत्या. अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात तहसीलदारांकडे तक्रारीही केल्या. वारंवार होणाऱ्या अडवणुकीला शेतकरी वैतागले होते. शुक्रवारी आठवडे बाजार असल्याने शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी सातबारा उतारा काढण्यासाठी कार्यालयासमोर गर्दी केली. कुळधरण, सुपेकरवाडी, राक्षसवाडी खुर्द व बुद्रुक येथील शेतकऱ्यांना शुक्रवारी रिकाम्या हातांनीच परतावे लागले. शनिवारी उतारे घेऊन सोमवारी पिकविम्याची रक्कम भरण्याचे नियोजन कोलमडले. शेतकऱ्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन महसूल कर्मचाऱ्यांची टंचाई आढावा बैठकही रद्द करण्यात आली होती. नेमून दिलेल्या दिवशी तलाठ्याने काम न केल्याने तलाठ्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे, असे तहसीलदार जयसिंग भैसडे यांनी सांगितले. (वार्ताहर)तलाठ्याची दिलगिरीशेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन आमदार राम शिंदे कुळधरण येथे आले. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. आ. शिंदे यांनी तलाठ्याला शेतकऱ्यांसमोर सूचना केल्या. शुक्रवारी आपण कार्यालयात नसल्याची कबुली देत तलाठी अनारसे यांनी दिलगिरी व्यक्त केली.