खरीप हंगामाचा २०२०-२१ यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरविण्यात आला होता. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले होते. त्यानुसार एका खासगी कंपनीकडून बाजरी, भुईमूग, सोयबीन, तूर, कापूस, मका आणि कांदा पिकांचा विमा घेण्यात आला. कोपरगाव तालुक्यात सुमारे २२ हजार शेतकऱ्यांचा त्यात समावेश होता.
ऑक्टोबर २०२० मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या होत्या. या कंपनीकडून नुकसानीचे सर्वेक्षणही करण्यात आले होते. मात्र, केवळ एक हजार ७०० शेतकऱ्यांनाच नुकसानभरपाई मिळाली. उर्वरित शेतकरी यापासून वंचित राहिले.
गेल्या दीड वर्षापासून देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीचे संकट आहे. हाताशी आलेल्या पिकांनाही बाजारपेठ नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे आर्थिक विवंचना आहे. दळणवळण, बाजारपेठा बंद असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. या परिस्थितीमध्ये त्यांना विम्याची रक्कम मिळाली तर चालू हंगामात पिके उभी करण्यास हातभार लागेल, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.