नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी समर्थक नगरसेवकांसह मुंबईत अनेक मंत्र्यांची या आठवड्यात भेट घेतली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री अदिती तटकरे, के. सी. पाडवी व इतर मंत्र्यांना यावेळी शहरातील विकास कामांप्रश्नी निवेदने देण्यात आली. शहरातील रेल्वे भुयारी मार्ग, वाढीव पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना आदी कामांचा यावेळी पाठपुरावा करण्यात आला. अपूर्ण व नवीन कामांना निधीची मागणी केली गेली.
मात्र असे असले तरी शहरातील अनेक मोठी कामे व योजना साडे चार वर्षांपासून रखडल्या आहेत. यातील काही कामांची तर उद्घाटनेही करण्यात आली. याशिवाय जवळपास पूर्णत्वास गेलेल्या काही कामांचे लोकार्पण होऊ शकलेले नाही. केवळ राजकीय इच्छाशक्ती अभावी यातील काही कामे अडकून पडलेली आहेत.
सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ २८ डिसेंबरला संपत आहे. प्रत्यक्ष निवडणुकांपूर्वी ४५ दिवस आधीच आचारसंहिता लागू होते. आचारसंहितेत नवीन विकास कामांना ब्रेक लागतो. निधीची घोषणा, निविदा व उद्घाटने करता येत नाही. त्यामुळे उर्वरित तीन महिन्यांच्या सत्ताकाळात पालिकेत कोणतेही नवीन काम मार्गी लावणे शक्य नाही. किमान जुनी कामे तरी पूर्ण व्हावीत अशीच शहरवासीयांची भावना आहे. त्यामुळे नगराध्यक्षा आदिक व नगरसेवकांचा मुंबई दौरा निव्वळ फार्स ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
------
रखडलेली कामे त्यामागील कारण
भुयारी गटार योजना : शेती महामंडळाकडून भूसंपादन.
शहरात सॅटेलाईट मंडई : जागेची अडचण.
(खा. सुप्रिया सुळे यांनी केले होते भूमिपूजन)
मत्स्यालय : निधी उपलब्ध नाही.
खासदार आदिक नाट्यगृह : अग्निशमन दलाचा परवाना नाही.
बेलापूर रस्त्यावरील वेस : निधीची कमतरता.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा.