अहमदनगर : मुंबई येथून आणलेल्या चार लाख रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्यांची येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील एल अॅन्ड टी कंपनीत न उतरविता परस्पर विक्री करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ही घटना सोमवारी रात्री घडली़ मुंबई येथील पवई औद्योगिक वसाहतीत एल अॅन्ड टी कंपनी आहे़ या कंपनीतून चांदीच्या पट्ट्या घेऊन हंबल सर्व्हिसेस पवई ट्रान्सपोर्टचा मालट्रक (क्रमांक - एम़एच़ ०४, डी़एस़९९३५) नगरकडे निघाला होता़ हा माल येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील एल अॅन्ड टी कंपनीत पोहोच करायचा होता़ मात्र, ट्रक चालक व हंबल ट्रान्सपोर्टच्या मालकाने चांदीच्या पट्ट्यांची परस्पर विल्हेवाट लावली़ ही बाब माल उतरवून घेताना कंपनी व्यवस्थापनाच्या निदर्शनास आली़ त्यानंतर कंपनीच्या वतीने याप्रकरणी नागेशचंद आढाव यांनी पोलिसांना माहिती दिली़ आढाव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी भादंवि ४०६ नुसार दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेजवळ करीत आहेत़ (प्रतिनिधी)
चांदीच्या पट्ट्यांची परस्पर विल्हेवाट
By admin | Updated: July 12, 2014 01:10 IST