पारनेर : जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा सुमारे सोळा तासांचा मुक्काम किन्ही गावासाठी फलदायी ठरला आहे. जिल्हाधिकार्यांनी रात्री केलेले मार्गदर्शन, नागरिकांनी मांडलेले प्रश्न व सकाळी विविध खात्यांचा फौजफाटा येऊन पाझर तलाव व नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम सुरूही झाले. यामुळे गावकरीही विकासाच्या वाटेवर जाण्यासाठी पुढाकार घेत आहेत. ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान, त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी शनिवारी सायंकाळी सात वाजता किन्ही गावी दाखल झाले. जिल्हाधिकारी रात्री गावात आल्यानंतर सारा गावच जमा झाला. जिल्हाधिकार्यांनी ओंकारबाबांंच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर तिथेच घोंगडी बैठक सुरू केली. रात्री आठ ते दहा असा तब्बल दोन तास मग गांवकर्यांचे प्रश्न व जिल्हाधिकार्यांची उत्तरे असा दोन तास संवाद चांगलाच रंगला. गावकर्यांनी विविध प्रश्न मांडले. जिल्हाधिकार्यांनी प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार डॉ. विनोद भामरे यांना कामांविषयी रात्रीच केलेल्या सुचनेनुसार रविवारी सकाळी अधिकारी हजर झाले. जिल्हाधिकार्यांनी लगेच शिवारफेरी सुरू करताना रात्री ग्रामस्थांनी केलेल्या कामांची पाहणी केली. त्यानंतर कृषी विभागाने जे.सी.बी च्या मदतीने प्रत्यक्षात गाळ काढण्याचे काम सुरू केले. नंतर जिल्हाधिकार्यांनी सुमारे अडीच तासांच्या फेरीत बहिरोबावाडी शाळेचे कंपाउंड तसेच इतर कामांचे तातडीने प्रस्ताव करण्याचे संबंधितांना आदेश दिले. (तालुका प्रतिनिधी) किन्हीसारखे ग्रामीण गाव निवडून तेथे रात्री मुक्काम करुन नागरिकांशी संवाद साधला. गावातील समस्या अनुभवास मिळाल्या. सरकारी योजनांचा चांगल्या पध्दतीने वापर, अंमलबाजावणी केल्यास गावात बदल घडू शकतो याची जाणीव त्यांना करून दिली. शाश्वत विकासाला शिक्षण व शेती, जलसंधारण हे पर्याय असल्याचे सांगितले. अनेक समस्यांचे निराकरण केले. काही प्रश्न राहतील, पण गावाकडच्या समस्या कळणे व त्या सोडविणे हा वेगळा आनंद ठरला आहे. अनिल कवडे, जिल्हाधिकारी, नगर
जिल्हाधिकार्यांचा मुक्काम किन्ही गावासाठी फलदायी
By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST