अहमदनगर : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर नियमांचे पालन न करता नागरिक घराबाहेर पडले. पूर्वीप्रमाणे लग्नसमारंभ, पर्यटन, ग्रामपंचायतींच्या निवडणुका आणि नियमांचे उल्लंघन करीत केलेल्या प्रवासामुळे दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली. दुसऱ्या लाटेनंतर नियम शिथिल करताच पुन्हा गर्दी करू होऊ लागली असून, त्यावर नियंत्रण न ठेवल्यास तिसरी लाट येऊ शकते.
नगर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १२ मार्च २०२० रोजी आढळून आला होता. पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर तातडीने लॉकडाऊन केला गेला. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जमावबंदी आदेश लागू केला गेला. जिल्ह्याच्या सीमेवर पथके तैनात करण्यात आली. चाचण्या वाढविल्या गेल्या. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. रुग्ण आढळून आलेला भाग कंटेन्मेंट करून प्रशासनामार्फत अत्यावश्यक सेवा पुरविल्या गेल्या. नगर शहरात पहिला कंटेन्मेंट झोन मुकुंदनगर भागात करण्यात आला. त्यानंतर ही संख्या वाढून १७ वर पोहोचली होती. सुरुवातीला सर्वाधिक रुग्ण शहरी भागात आढळून येत होते. त्यानंतर ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. परिस्थिती आटाेक्यात आल्यानंतर नियम शिथिल करण्यात आले. पहिला अनलॉक ४ ऑगस्ट २०२० रोजी जाहीर झाला. नियम शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या; परंतु नियमांचे पालन न करता शहरासह जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच हजारोंच्या उपस्थित लग्नसमारंभ आयोजित केले गेले. दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. जिल्हाभर सामूहिक प्रचाराचा धुराळा उडाला. सहकारी संस्थांच्याही निवडणुका घेतल्या गेल्या. लॉकडाऊनमुळे घरात बसून असलेले नागरिक पर्यटनासाठी इतर जिल्ह्यात गेले. शहरातील नागरिक गावाकडे गेले. गाव खेड्यातून कामगार पुन्हा शहरात दाखल झाले. सर्वकाही सुरू झाल्यामुळे नागरिकही बिनधास्त झाले. प्रशासनाने ढील दिली. वाहनांची तपासणी होत नसल्याने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या वाढली. जनजीवन पूर्ववत होत असतानाच दुसरी लाट येऊन धडकली. दुसऱ्या लाटेत सुरुवातीला रुग्णसंख्या कमी होती. मात्र, काही दिवसांतच ती झपाट्याने वाढून एप्रिलमध्ये कोरोनाने कहर माजविला. जिल्ह्यातील रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा ओलांडला होता. दुसऱ्या लाटेची प्रशासकीय पातळीवरही कोणतीही तयारी केली गेली नाही. वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे बेड कमी पडू लागले. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. रेमडेसिविर उपलब्ध होत नव्हते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात भयावह स्थिती निर्माण झाली. रुग्णांची संख्या वाढून दुप्पट झाली. मागील मे महिन्याच्या शेवटी रुग्णसंख्या घसरली. त्यामुळे राज्य सरकारने १ जूनपासून नियम शिथिल करीत वेळेचे बंधन घातले खरे; परंतु पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. पहिल्या लाटेनंतर ज्या चुका झाल्या, त्याच चुका पुन्हा केल्यास तिसरी लाट अटळ आहे.
.....
हजारोंच्या उपस्थितीत लग्न समारंभ
पहिल्या लाटेनंतर सरकारने लग्न समारंभासाठी गर्दी न करण्याचे आदेश दिले होते. शहरी भागात कारवाया झाल्याने मंगल कार्यालय चालकांनी काही प्रमाणात नियमांचे पालन केले; परंतु ग्रामीण भागात मात्र हजारोंच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडले. लग्न समारंभात मास्क न वापरता नागरिक सहभागी झाले. त्यामुळे संसर्ग वाढवून एकदम उद्रेक झाला. लग्न समारंभामुळे संपूर्ण कुटुंब पॉझिटिव्ह झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.
....
गावांमध्ये ग्रामपंचायतींचा सामूहिक प्रचार
पहिल्या लाटेत ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होती. त्यामुळे कोरोनाबाबत ग्रामस्थ आधीच बेफिकीर होते. त्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला. उमेदवार व कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. सामूहिक प्रचारातून कोरोनाचा संसर्ग झाला. गावोगावी रुग्णसंख्या वाढली. त्यात गावाकडील रुग्णांनी अंगावर काढत घरगुती उपचार केले. काहींनी आजार लपविला. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या अचानक वाढली. परिणामी बेड कमी पडले. आरोग्य यंत्रणेवर ताण आला.
.......
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन
कोरोनाची पहिली लाट ओसरली. सहा महिन्यांपासून घरात बसून असलेले नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. कोरोना गेला, असे समजून नियमांकडे दुर्लक्ष केले गेले. अनेक जण तर मास्कही लावत नव्हते. हॉटेल, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील गर्दी वाढली. गावच्या पारावर लोकं पूर्वीप्रमाणे एकत्र येत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळाले. एकमेकांचा संपर्क वाढला. कार्यालये सुरू असल्याने अभ्यंगतांची ये-जा सुरू झाली. सरकारी कार्यालयांतील बैठका पूर्वीप्रमाणेच होऊ लागल्या. त्यामुळे कार्यालयांतील अनेक अधिकारी-कर्मचारी पॉझिटिव्ह आले.
.......
पर्यटनस्थळी गर्दी
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने सर्वच जण घरात बसून होते. कोरोनाचा आकडा ओसरल्याने नागरिकांमधील भीती कमी होत गेली. शासनाने पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी झाली. मास्क न वापरता नागरिक पर्यटन स्थळी वावरू लागल्याने संसर्ग वाढला.
........
प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली
पहिली लाट ओसरल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले. लॉकडाऊनच्या काळात वाहनांची तपासणी केली जात होती. नियम शिथिल झाल्यानंतर प्रवासाला मुभा मिळाली. नियमांचे पालन न करता नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले. रस्त्यावरही गर्दी वाढली. त्यामुळे कोरोना संसर्ग होऊन दुसऱ्या लाटेत अचानक रुग्णसंख्या वाढली.
.....
पहिला अनलॉक
४ ऑगस्ट २०२०
एकूण रुग्णसंख्या
७५ हजार
मृत्यू
१ हजार १४३
....
दुसरा अनलॉक
१ जून २०२१
एकूण रुग्णसंख्या
१ लाख ५० हजार
मृत्यू
१ हजार ४२०
....
मनपाच्या ४ दक्षता पथकांची नजर
महापालिकेने शहरातील गर्दीवर नजर ठेवण्यासाठी चार दक्षता पथकांची नियुक्ती केली, तसेच पोलिसांकडून प्रमुख चौकांत वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दुसऱ्या लाटेत विनाकारण फिरणाऱ्यांची रस्त्यावरच कोविड चाचणी करण्याची मोहीम प्रशासनाने राबविली. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास काही अंशी मदत झाली. चाचणीच्या भीतीने विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी झाली.