शासकीय विश्रामगृह येथे रविवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची पाटपाण्यासंदर्भातील भूमिका पत्रकार परिषदेतून त्यांनी विषद केली. यावेळी मीनानाथ पांडे, सोन्याबापू वाकचौरे, संभाजी वाकचौरे, मंदाबाई नवले, शिवाजी नेहे, विक्रम नवले उपस्थित होते. संगमनेर येथे पाटबंधारे व जलसंपदा अधिकारी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचा गोषवारा सांगत तालुक्यातील काँग्रेस पक्ष शेतकरी आंदोलनाबरोबर असल्याचे मधुकर नवले यांनी स्पष्ट केले.
उच्चस्तरीय उजव्या पाईप कालव्यातून केवळ १५ क्युसेक पाणी मिळणार आहे. हे पाणी सिंचनाची पूर्ण तहान भागवणारे नाही. उपसा सिंचन हा पर्याय निवडा लागेलच. तसेच भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात तालुक्यातील ४ हजार १०० हेक्टर क्षेत्र ओव्हरलॅप होऊन निळवंडे लाभक्षेत्रात येते, याचा विचार करून तालुक्यातील ८ हजार हेक्टर क्षेत्रफळाने कसे बारमाही बागायती होईल, यासाठी आम जनतेचा लढा भविष्यात उभारावा लागेल. संगमनेरच्या नेतृत्त्वाला टीकेचे लक्ष करणे योग्य नाही. आंदोलनातून कुणीही जनतेच्या भावनांशी खेळू नये, असे नवले म्हणाले.
भूसंपादनाच्या घोळामुळे म्हाळादेवी जलसेतूचे काम सुरू होण्यास उशीर झाला. म्हणून उजव्या कालव्याचे काम रखडले. तांत्रिक कारणे समजून घ्यावीत, आंदोलनातून गैरसमज पसरवले जाऊ नयेत, असे मत मीनानाथ पांडे यांनी व्यक्त केले.