अहमदनगर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला टीव्हीमुळे फटका बसल्याचा दावा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी येथील कार्यक्रमात केला. शहर प्रेस क्लबतर्फे पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, व्हॉटस अॅप आणि फेसबुकवर मुलांचे लक्ष केंद्रित झाले आहे. त्याचा मुलांच्या सवयींवरही परिणाम होतो. मुलांचा अभ्यासाचा सगळा वेळ टीव्ही बघण्यात जातो. टीव्ही किती परिणामकारक आहे, हे आम्ही लोकसभा निवडणुकीत पाहिल्याचे थोरात म्हणाले. वेगवेगळे चॅनल्स पाहण्यात मुलांचा वेळ जातो. अत्याधुनिक साधनांनी माणसाचा वेळ व्यापून टाकला आहे. मात्र पालकांनी त्याकडे वेळीच लक्ष दिले तर मुलांचे भविष्य घडेल. राजकारणी, पत्रकार आणि पोलिसांना आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे पाल्याची जबाबदारी मुलाच्या आईवर येते. स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी टीव्हीचा रिमोट पालकांच्या हाती असायला हवा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमास महापौर संग्राम जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, अभिनेत्री रुपाली कृष्णराव, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, ज्येष्ठ पत्रकार भास्करराव डिक्कर, ब्रिजलाल सारडा, बालरोगतज्ज्ञ डॉ. दीपक अग्रवाल, प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, इब्राहिम पठाण, आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत पाल्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
लोकसभेत काँग्रेसला टिव्हीमुळे फटका
By admin | Updated: June 30, 2014 00:34 IST