अहमदनगर: शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ भाजपाकडून सेनेकडे घेण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु केल्या आहेत. काँग्रेस आघाडीतही नगर, पारनेर व कर्जत-जामखेड मतदारसंघातील बदलाबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. श्रीगोंदा मतदारसंघ सेनेकडे घेऊन संगमनेर मतदारसंघ भाजपाला देण्याचा सेनेचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे अकोले येथील भाजपाचे कार्यकर्ते अकोले मतदारसंघावर दावा सांगत आहेत. अकोले मतदारसंघात सेनेला यश मिळत नसल्याने यावेळी हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी मागणी आहे. सेना-भाजपाच्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघातील बदलांबाबत मात्र कोणत्याही मागण्या नाहीत. सेनेच्या धर्तीवर राष्टÑवादीतही बदलांबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. नगर मतदारसंघ हा काँग्रेसच्या कोट्यात आहे. मात्र या मतदारसंघातून संग्राम जगताप हे लढण्यासाठी इच्छुक असल्याने हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे घेण्याची चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरु होती. पारनेरमधूनही राहुल झावरे तयारी करत असल्याने हा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन मतदारसंघांच्या बदलाची चर्चा जोर धरु शकते. कर्जत-जामखेड हा मतदारसंघ काँग्रेसच्या कोट्यात आहे. मात्र हा मतदारसंघ राष्टÑवादीला हवा आहे. जिल्हा परिषदेत या मतदारसंघात राष्टÑवादीची ताकद मोठी आहे. शिवाय अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून अजित पवार यांनी या भागावर लक्ष केंद्रीत केल्याने राष्टÑवादी या मतदारसंघावर दावा सांगू लागली आहे. लोकसभा निवडणुकीतील अपयशाच्या धक्क्यातून अद्याप जिल्ह्यातील नेतेही बाहेर निघालेले नाहीत. विधानसभेला आपणाला वातावरण अलबेल राहील की नाही? याबाबत दोन्ही काँग्रेसचे अनेक नेते साशंक आहेत. त्यामुळे परिस्थितीचा अंदाज पाहून पुढचे पाऊल उचलण्याचे अनेकांचे धोरण आहे.
काँग्रेस आघाडीतही मतदारसंघ बदलाचे वारे
By admin | Updated: May 28, 2014 00:13 IST