जामखेड : शहराला पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व जोड तलाव सलग दुसऱ्या वर्षीही ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे, तसेच परिसरातील शेतीला पाणी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
भुतवडा तलाव भरल्यामुळे जामखेड शहरातून वाहणाऱ्या विंचरणा नदीलाही या पावसाळ्यातील पहिला पूर आला आहे. पूर पाहण्यासाठी नागरिकांची दिवसभर गर्दी होती.
भुतवडा तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील पाटोदा तालुक्यातील सौताडा, भवरवाडी या परिसरात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. त्यामुळे त्या परिसरात असलेले पाच तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. यामुळे रामेश्वर (सौताडा) येथील धबधबा कोसळू लागला आहे. भुतवडा तलाव ११९ दशलक्ष घनफूट व तर जोड तलाव ६५ दशलक्ष घनफूट क्षमतेचा असून, रविवारी पहाटे सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून सांडव्याहून पाणी वाहू लागले आहे.
भुतवडा तलावापासून उगम पावलेल्या विंचरणा नदीला पूर आला आहे. या विंचरणा नदीवर काझेवाडी तलाव असून, तो भरण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर, रत्नापूर, वंजारवाडी, पिंपरखेड, चोंडी व जवळा येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. तेही लवकर भरण्याची शक्यता आहे. भुतवडा तलाव व जोड तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे जामखेड शहर व तीन वाड्यावस्त्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. यापूर्वी शहराला पाच दिवसांआड पाणीपुरवठा होत होता, तो आता दोन दिवसांनी होईल. भुतवडा परिसरातील एक हजार हेक्टर क्षेत्रावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्नही वर्षभरासाठी मिटला आहे.
-----
०५ भुतवडा
भुतवडा तलाव भरल्यानंतर सांडव्याहून पडणारे पाणी.