अहमदनगर : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करीत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गडावर दसरा मेळाव्याला मुंडे यांनी राजकीय भाषण केल्यास धार्मिक संस्था (दुरुपयोग प्रतिबंध) कायदा १९८८ कलमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येईल. त्यांचे मंत्रीपद रद्द करण्याची मागणी जाती निब्बान मोहिमेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. राजकीय भाष्यासाठी मुंडे यांनी स्वतंत्रपणे गोपीनाथ गडाची निर्मिती केलेली असताना पाथर्डी तालुक्यातील भगवान गडावर दसऱ्याला भाषण करण्यासाठी त्यांनी दबाव तंत्राचा वापर सुरु केला आहे. सुवर्ण मंदिराचा वापर भिंद्रणवाले यांनी राजकीय वापरासाठी केला. त्यात देशात मोठी उलथापालथ झाली होती. त्यानंतर केंद्र सरकारने धार्मिक संस्था (दुरोपयोग प्रतिबंध) कायदा १९८८ मंजूर केला. त्यानुसार देशातील कोणत्याही धार्मिक स्थळाचा वापर राजकारणासाठी होणार नसल्याचे या कायद्याद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, मुंडे सत्तेचा गैरवापर करुन दसऱ्याला राजकीय भाषण करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी गडावरुन राजकीय भाष्य केल्यास त्यांना न्यायलयात खेचण्यात येईल. मुंडे मंत्रिपदाचा दुरुपयोग करीत असल्याने त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात यावे, असे निवेदन जाती निब्बान मोहिमच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आले आहे. निवेदनावर अॅड. गवळी, कॉ.बाबा आरगडे, अशोक सब्बन, प्रकाश थोरात यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (प्रतिनिधी) .............
...तर पंकजा मुंडेंविरोधात याचिका दाखल करणार
By admin | Updated: October 2, 2016 00:58 IST