श्रीगोंदा : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ६ एप्रिलपासून लाॅकडाऊन चालू आहे. या काळात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद आहेत. पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यात १ जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे नगर जिल्ह्यातील दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा यांनी केली आहे.
बोरा यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार यांना निवेदन दिले आहे. बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी श्रीगोंदा व्यापारी असोसिएशनचे निवेदन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देऊन श्रीगोंदा तालुक्यातील दुकाने किमान सहा तास उघडण्यासंदर्भात चर्चा केली.
बोरा म्हणाले, एक महिन्यापासून दुकाने बंद असल्याने छोटे-मोठे दुकानदार चांगलेच अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य मिळत नाही. शेतीमालाची विक्री करता येत नाही. त्यामुळे शासनाने दुकाने उघडण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.