अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गाजत असलेल्या बनावट अपंग शिक्षक प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. एकाच आरोपाखाली निलंबित असणाऱ्या ७६ बनावट अपंग शिक्षकांपैकी १७ वर विभागीय चौकशीत दोष सिध्द झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. तर उर्वरित पैकी २४ शिक्षकांवर दोष सिध्द नसल्याचा अहवाल पाठविल्याने खळबळ उडाली आहे. उर्वरित ३८ शिक्षकांचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त होणे बाकी आहे.बदली टाळण्यासाठी जिल्ह्यातील ७६ प्राथमिक शिक्षकांनी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा परिषदेला सादर केले होते. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी या बनावट अपंग प्रमाणपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यात ७६ शिक्षकांचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे सिध्द झाले होते.या शिक्षकांना निलंबित करण्यात येऊन त्यांची विभागीय आयुक्त कार्यालयातून विशेष चौकशी अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू होती. विशेष म्हणजे या चौकशीत सुरूवातीला १७ शिक्षकांवर चौकशी अधिकाऱ्याने बनावट अपंग प्रमाणपत्र प्रकरणी आरोप सिध्द होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा अहवाल जिल्हा परिषदेला पाठविला होता. त्यावर कारवाई होणे प्रस्तावित असताना दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला आणखीन २४ शिक्षकांचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. यात या २४ शिक्षकांवर दोषारोप सिध्द होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)क्लिनचिट मिळालेले शिक्षक रावसाहेब यादव औटी, रामदास ठकाजी गाढवे, बबन दगडू शिंदे, शैला सुखदेव दुधाडे, राधा लक्ष्मण पठारे, विठ्ठल रामभाऊ क्षीरसागर, बाबुराव ठकाजी झावरे, मारुती नाथाजी खोसे, रामदास भगवान शिंदे, आंबादास धोंडिबा ठाणगे, सदाशिव नारायण व्यवहारे, सरला परमेश्वर गावडे, रंगनाथ भदरगे, वैशाली लोंढे, संजय घोडके, गोरख धस, दत्तात्रय पठारे, सूर्यभान वडितके, योजना काकड, तानाजी गोडे, सुनीता थोरात, विद्या राऊत, मारूती भिका गायकवाड, सुरेश विठ्ठल नवले.
‘ते २४’ निर्दोष कसे?
By admin | Updated: June 18, 2014 01:21 IST