इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 10:11 AM2024-05-14T10:11:29+5:302024-05-14T10:18:38+5:30

भारतानं सोमवारी इराणसोबत चाबहार बंदराबाबत मोठा करार केला आहे. दोन्ही देशातील करारानुसार पुढील १० वर्ष इराणच्या दक्षिणेकडील चाबहार बंदराचा विकास आणि ते चालवण्याची जबाबदारी भारताकडे असेल. भारतासाठी हा करार अतिशय महत्त्वाचा असून याला पाकिस्तानमध्ये चीनद्वारे विकसित ग्वादर बंदराला शह देण्याच्या रुपाने पाहिले जात आहे.

भारत आणि इराणमधील या करारामुळे अमेरिकेलाही मिरची झोंबली आहे. हा करार अमेरिकेला पसंत नसून त्यांनी भारताला निर्बंधांची आठवण करून दिली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने भारत आणि इराण यांच्यातील चाबहार बंदर करारावर नाराजी व्यक्त केली आहे.

अमेरिकेनं म्हटलं की, आम्ही भारत-इराण यांच्यातील कराराबाबत माहिती घेतली. इराणवर आम्ही निर्बंध लावले आहेत. आम्ही ते कायम ठेवणार, कुठलाही देश असो, जो इराणसोबत उद्योग करार करतो त्यांनाही या संभाव्य जोखीम आणि निर्बंधाबाबत माहिती असायलं हवं, जे निर्बंध त्यांच्यावरही लागू शकतात.

यावेळी एका पत्रकाराने प्रश्न केला की, हे बंदर एकप्रकारे पाकिस्तानमध्ये चीनद्वारे विकसित केले जाणारे ग्वादर बंदराला शह देण्याच्या रुपाने पाहिले जाते, ते पाहता वॉश्गिंटन निर्बंधातून भारताला कुठली सूट देऊ शकते का त्यावर अमेरिकेने एका शब्दात नाही असं उत्तर दिले.

इराणच्या चाबहार येथे २ पोर्ट आहेत. एक शाहिद कलंतरी तर दुसरं शाहिद बहिश्ती, भारताच्या शिपिंग मंत्रालयाकडून ग्लोबल शाहिद बहिश्तीचं काम सांभाळले जाते, आता पुढील १० वर्षासाठी या बंदराचा विकास आणि त्याचा वापर भारताला करता येणार आहे. त्यासाठी १० वर्षाचं लॉग्न टर्म करार भारत-इराणमध्ये झाला आहे.

भारत इराण, अफगाणिस्तान, कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानसारख्या देशापर्यंत सुलभपणे पोहचण्यासाठी चाबहार बंदर करार महत्त्वाचा आहे. याठिकाणी टर्मिनल विकसित करण्याचं काम भारत करेल. इराणसोबतच्या नव्या करारामुळे इराणमार्गे दक्षिण आशिया आणि मध्य आशिया दरम्यानचा व्यापार मार्ग खुला होईल.

पाकिस्तानमधील कराची आणि ग्वादर बंदरांना मागे टाकून मध्यपूर्वेतील व्यापारासाठी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवरील अवलंबित्व संपुष्टात येईल. या करारानुसार भारत चाबहार बंदराच्या विकासासाठी १२ कोटी डॉलर गुंतवणूक करेल. जेणेकरून मध्य आशियातील देशांपर्यंत व्यापार सुलभ होईल.

शाहिद बहिश्ती बंदराच्या विकासाची पहिली फेज डिसेंबर २०१७ ला पूर्ण झाली होती. तेव्हा अफगाणिस्तानातून गहू भारतात आले होते. २०१९ ला पहिल्यांदाच चाबहार पोर्टमधून अफगाणिस्तानातून सामान भारतात आलं होते. या बंदराच्या विकासाचं काम चार टप्प्यात पूर्ण होईल. त्यानंतर त्याची क्षमता वार्षिक ८.२ कोटी टन होईल.

इराणमध्ये बनणारं चाबहार बंदर हे चीन आणि पाकिस्तानला चोख उत्तर असल्याचं मानलं जाते त्यामुळे भारत या करारासाठी विशेष भूमिका घेत आहे. पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात चीनच्या उपस्थितीमुळे चाबहार बंदर भारताकडे असणं फायदेशीर ठरणार आहे.

चीन पाकिस्तानात ग्वादर बंदर विकसित करतोय. ग्वादर पोर्ट आणि चाबहार पोर्ट यांच्यातील रस्तेमार्गे अंतर ४०० किमी आहे. परंतु समुद्रीमार्गे हे अंतर १०० किमी इतके आहे. चाबहार पोर्ट आंतरराष्ट्रीय नॉर्थ-साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरला जोडला जाईल. त्यामुळे भारत, इराण, अफगाणिस्तान, आर्मेनिया, अजरबैजान, रशिया, मध्य आशिया आणि युरोपपर्यंत जहाज, रेल्वे आणि रस्ते मिळून ७२०० किमी मोठे नेटवर्क तयार केले जाऊ शकते. त्यातून भारताला युरोप आणि रशियापर्यंत पोहचणं सहज होईल.