हितेंद्र ठाकूर यांचे ठरले! बविआच्या ‘या’ ४ नगरसेवकांपैकी होणार महापौर; कोणाची नावे आघाडीवर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 14:05 IST2026-01-23T14:02:08+5:302026-01-23T14:05:26+5:30
Vasai Virar Municipal Corporation Election Result 2026: वसई-विरारच्या महापौरपदासाठी हालचालींना वेग आला असून, हितेंद्र ठाकूर यांच्या मनात नक्की कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हितेंद्र ठाकूर यांचे ठरले! बविआच्या ‘या’ ४ नगरसेवकांपैकी होणार महापौर; कोणाची नावे आघाडीवर?
Vasai Virar Municipal Corporation Election Result 2026: एक वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीच्या तिन्ही आमदारांचा पराभव झाला होता. मात्र, यातून सावरत बहुजन विकास आघाडीने वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार प्रचार व कार्यकर्त्यांच्या जोरावर या निवडणुकीत मुसंडी मारत पुन्हा एकदा एकहाती सत्ता मिळवली. ११५ जागांसाठीच्या वसई-विरार मनपा निवडणुकीत बविआचे ७० उमेदवार निवडून आले. भाजपला ४३, काँग्रेसला १ आणि शिंदेसेनेला १ जागेवर विजय मिळाला आहे. या निवडणुकीच्या निकालामुळे भाजप आणि बहुजन विकास आघाडीत चांगलीच शाब्दिक चकमक उडाली होती.
वसईच्या जनतेने बविआला स्पष्ट बहुमत देत सत्ता सोपवली आहे. या निवडणुकीत उद्धवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार), काँग्रेस, शिंदेसेना, वंचित, बसप, सपा, आप, एमआयएम यांच्यासह अपक्षांना वसईच्या जनतेने सपशेल नाकारले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहता वसई-विरार महापालिका हद्दीतून बविआसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरली होती. त्यांच्या अस्तित्वाची जणू लढाई होती. मात्र या महापालिका निकालाने पुन्हा बविआचे वसईविरारच्या राजकारणातील महत्त्व अधोरेखित झाले आहे. या निकालाने बविआच्या मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. यानंतर सत्ता स्थापनेसाठी भाजपा ऑपरेशन लोटस राबवू शकते, असे म्हटले जात होते. परंतु, या शक्यता फेटाळण्यात येत असून, आता हितेंद्र ठाकूर यांनी महापौरपद निवडीची तयारी सुरू केल्याचे म्हटले जात आहे.
‘या’ ४ नगरसेवकांपैकी होणार महापौर; बविआतील कोणाची नावे आघाडीवर?
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लवकरच महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेत आपली पकड मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीचे (बविआ) सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी अत्यंत सावध पावले टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार महानगरपालिकेत सध्या महापौर पदाच्या शर्यतीत ४ नावे चर्चेत आहेत. बहुजन विकास आघाडी पक्षाचे संकटमोचक आणि रणनीतीकार अजीव पाटील यांचे नाव सर्वात आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. वसई मनपा निवडणुकीत आक्रमक झालेल्या भाजपाला रोखण्यासाठी अजीव पाटील यांच्यासारख्या अनुभवी आणि आक्रमक प्रवक्त्याची गरज पक्षाला गरज असल्याचे म्हटले जात आहे. तसेच अजीव पाटील हे पक्षाचे संघटक सचिव असल्याने नगरसेवकांची मोट बांधण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे सांगितले जाते. हितेंद्र ठाकूर यांच्या मनात नक्की कोण? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
- अजीव पाटील: अजीव पाटील हे माजी स्थायी समिती सभापती आणि पक्षाचे रणनीतीकार मानले जातात. भाजपला रोखण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.
- बेटा भोईर: स्थानिक आगरी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
- प्रकाश रॉड्रीग्ज: हे माजी उपमहापौर आणि ख्रिश्चन बहुल पट्ट्यातील महत्त्वाचे नेतृत्व करतात.
- शेखर धुरी: चार दशकांहून अधिक राजकीय अनुभव असलेले भाजपचे माजी नेते शेखर धुरी यांनी अलीकडेच बविआ पक्षात प्रवेश केला. वसईतून निर्णायक विजय मिळवून महापौरपदासाठी दावेदार मानले जात आहेत.
दरम्यान, वसई-विरार पालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपला पुढील काळात वसई-विरारमध्ये अधिक तळागाळापर्यंत पोहोचून काम करावे लागणार आहे. तर त्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांना त्यात अधिक लक्ष घालावे लागू शकते. शिंदेसेनेला या निकालाने आपण शहरात कार्यकर्त्यांची मोट बांधावी लागणार हे नक्की. तर उद्धवसेना, मनसे, काँग्रेसला मतदारांनी नाकारल्याने त्यांना मात्र अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.