Health Tips : एखादा मेहनतीचं किंवा जड उचल-खाचल करण्याचं काम केलं की, थकवा-सुस्ती येते हे आपल्याला माहीत आहेच. पण अनेकदा अनेकांसोबत असंही होतं की, कोणतंही मेहनतीचं काम न करता देखील थकवा येतो, चक्कर येते किंवा सुस्ती येते. इतकंच नाही तर कोणत्या कामात मनही लागत नाहीत. खासकरून उन्हाळ्यात असं अनेकदा होतं. पण असं का होतं, हे अनेकांना माहीत नसतं. तेच आपण समजून घेणार आहोत. जेणेकरून वेळीच यावर उपाय करता येईल.
डिहायड्रेशन आणि इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता
उन्हाळ्यात अशक्तपणा येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे डिहायड्रेशन. शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी घाम येतो. मात्र घामासोबत फक्त पाणीच बाहेर जात नाही, तर सोडियम आणि पोटॅशिअमसारखी महत्त्वाची खनिजेही शरीरातून कमी होतात. ही मिनरल्स स्नायू आणि नसांच्या कार्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यांची कमतरता झाल्याने ब्लड सर्कुलेशन स्लो होतं आणि थकवा, अशक्तपणा तसेच चक्कर येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
शरीरावर वाढलेला ताण
बाहेरचं तापमान वाढल्यावर शरीराला आतलं तापमान सामान्य ठेवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्वचेपर्यंत रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला जास्त वेगाने काम करावं लागतं, जेणेकरून घामाद्वारे शरीर थंड राहू शकेल. या अतिरिक्त उर्जेच्या वापरामुळे शरीर लवकर थकतं आणि कमजोरी जाणवू लागते.
खाण्यापिण्यातील बदल आणि लो ब्लड शुगर
उन्हाळ्यात भूक कमी लागणं ही कॉमन बाब आहे. त्यामुळे अनेक जण वेळेवर जेवत नाहीत किंवा फक्त थंड पेयांवर अवलंबून राहतात. यामुळे शरीरातील ब्लड शुगरची पातळी कमी होऊ शकते आणि अचानक अशक्तपणा जाणवू शकतो.
काही आरोग्य समस्या
ज्यांना आधीपासूनच डायबिटीस, अॅनिमिया, लो ब्लड प्रेशर किंवा थायरॉइडसारख्या समस्या आहेत, त्यांना उन्हाळ्याचा त्रास अधिक होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्यांची तब्येत आणखी बिघडू शकते.
उन्हाळ्यातील अशक्तपणापासून बचाव कसा कराल?
हायड्रेशनकडे विशेष लक्ष द्या
दिवसभरात किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्या. साध्या पाण्यासोबत नारळपाणी, लिंबूपाणी, ताक आणि ओआरएसचे द्रावण घेणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघते.
हलका आणि पौष्टिक आहार
एकावेळी जड जेवण करण्याऐवजी थोड्या-थोड्या अंतराने हलका आहार घ्या. कलिंगड, खरबूज, संत्री यांसारखी फळे आणि काकडी, दोडका यांसारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्या खा.
उन्हापासून बचाव करा
दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत सूर्याची किरणे सर्वाधिक तीव्र असतात. त्यामुळे शक्यतो बाहेर जाणे टाळा. बाहेर जाणे आवश्यक असल्यास सूती कपडे वापरा आणि डोके झाकून ठेवा.
पुरेशी झोप घ्या
उन्हाळ्यात उकाड्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. दररोज किमान 7 ते 8 तास झोप घेण्याचा प्रयत्न करा.
