बिल्डरधार्जिण्या तरतुदी बदलणार! रवींद्र चव्हाण यांचे संकेत; आणखी एक धक्का देणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 06:17 IST2026-01-18T06:17:48+5:302026-01-18T06:17:48+5:30
नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे नेतृत्वाचे धोरण

बिल्डरधार्जिण्या तरतुदी बदलणार! रवींद्र चव्हाण यांचे संकेत; आणखी एक धक्का देणार
नवी मुंबई : युडीसीपीआर अर्थात एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत असणाऱ्या काही तरतुदी शहर विकासाच्या दृष्टीने मारक असल्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक प्रचारात वारंवार सांगितले. ते अगदी खरे असून याबाबत ते, मी स्वत: पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन त्याबाबत सकारात्मक विचार करणार आहे. या माध्यमातून शहर विकासाचे हित जोपासले जाईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी स्पष्ट केले.
चव्हाण यांच्या स्पष्टीकरणामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री काळात युडीसीपीआरमध्ये केलेल्या बिल्डरधार्जिण्या तरतुदी बदलण्याचे संकेत मिळाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी शहरांचा सुनियोजित विकासासाठी आणलेल्या चांगल्या युडीसीपीआरमध्ये शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना बदल करून काही तरतुदी बदलून बिल्डरांची दलाली खाण्याचे काम केल्याचा आरोप गणेश नाईक यांनी संपूर्ण निवडणुकीच्या प्रचार काळात केला होता. यावरून शिंदे आणि नाईक दोघांत चांगलीच जुंपल्याचे दिसले होते. आता प्रचार संपून निवडणुकीचा निकालही लागला आहे. यात भाजपला नवी मुंबईसह संपूर्ण राज्यात धवल यश मिळाले. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील यशस्वी नगरसेवकांची भेट घेऊन चव्हाण यांनी संवाद साधला.
नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे नेतृत्वाचे धोरण
भाजपचे यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणांमुळेच मिळाले. नवी मुंबईत मिळालेले यश हे गणेश नाईक, आ. मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक यांच्या मेहनतीचे फळ आहे. नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
पराभूतांना मिळतील पदे
निवडणुकीत भाजपच्या काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा पराभव झाला आहे, अशा कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना पक्ष वाऱ्यावर सोडणार नाही. पालिकेतील पदांसाठी त्यांचा विचार केला जाईल, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.