माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 18:09 IST2026-01-20T18:08:25+5:302026-01-20T18:09:04+5:30
AIMIM Asaduddin Owaisi: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीत AIMIM ने १२५ जागांवर विजय मिळवला आहे.

माझ्या यशावर हे लोक जळतात..; भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांना ओवैसींचे प्रत्युत्तर
AIMIM Asaduddin Owaisi: असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMIM पक्षाने नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत अभुतपूर्व यश मिळवले. छत्रपती संभागीनगरमधील ३३ जागांसह, राज्यभरात पक्षाचे १२५ नगरसेवक निवडून आले. या ऐतिहासिक विजयानंतर पक्षाचे प्रमुख ओवैसी यांनी ‘मॅच-फिक्सिंग’ आणि भाजपची ‘बी-टीम’ असल्याच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
माझ्याविरोधात द्वेष...
मीडियाशी संवाद साधताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मी निवडणुका लढवतच राहीन. माझ्याविरोधातील द्वेष आणि आरोप हे मी जे करतोय त्यात यशस्वी ठरत असल्याचेच द्योतक आहेत. काहींना वाटते की ओवैसी आणि AIMIM मुळे राजकीय समतोल बिघडतो आहे. मुस्लिम समाजाला होणारे नुकसान भरून काढण्यासाठी आम्ही तो समतोल बिघडवणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
#WATCH | Hyderabad | On some alleging him against "match-fixing" with BJP, AIMIM President Asaduddin Owaisi says, "I will continue to fight elections. The hate and allegations towards me indicate that I am being successful in what I am doing...These people think the political… pic.twitter.com/FJX93jkacS
— ANI (@ANI) January 20, 2026
...तेव्हा गांधीवाद आठवला नाही?
भाजपसोबत ‘मॅच-फिक्सिंग’च्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना ओवैसींनी दुटप्पीपणाचा आरोप केला. बिहारमध्ये आमचे चार आमदार तुम्ही घेतले, तेव्हा ते गांधीवादी कृत्य होते का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, जेव्हा हे लोक आमदार फोडतात, तेव्हा ते ‘नेकी’ ठरते. महाराष्ट्रात शिवसेना आणि एनसीपी फुटला, कर्नाटक, मध्य प्रदेशात आमदार गेले, तेव्हा गदारोळ केला गेला. हीच त्यांची हिपोक्रसी आहे. तुम्ही आमचे चार फोडले; मात्र आम्ही पुन्हा जिंकलो, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.