"तुमचा मुलगा असल्याचा अभिमान…", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 11:56 IST2026-03-05T11:51:02+5:302026-03-05T11:56:49+5:30
शेवटी लेकाचं काळीज! वडिलांच्या निधनानंतर पूर्णपणे खचलाय अभिनेता, लिहिली डोळे पाणावणारी पोस्ट

"तुमचा मुलगा असल्याचा अभिमान…", प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला पितृशोक, वडिलांच्या आठवणीत लिहिली भावुक पोस्ट
Karanveer Bohra: हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता करणवीर बोहराला पितृशोक झाला आहे. त्याचे वडील ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेंद्र बोहरा यांचे निधन झालं आहे. सोशल मीडियावर याबाबत माहिती देत अभिनेत्याने वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट शेअर केली आहे. महेंद्र बोहरा यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे.
वडिलांच्या निधनानंतर करणवीरने भावूक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन महेंद्र बोहरा यांचे फोटो पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वडिलांच्या निधनाने अभिनेता पूर्णपणे खचला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये आपल्या भावना व्यक्त करत अभिनेत्याने म्हटलंय,"बाबा... माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. मला तुमची किती आठवण येते हे शब्दांत व्यक्त करता येत नाही. ज्यांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना हे किती वेदनादायक आहे हे माहित आहे. परंतु, आजपर्यंत तुम्ही आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगलात, याचं मला समाधान आहे. तुम्ही कायम म्हणालात की, तुम्हाला हे जग स्वतःहून सोडायचं आहे आणि तुम्ही अगदी तसंच केलंत."
मग पुढे अभिनेत्याने लिहिलंय,"तुम्ही मला आणि दीदीला आयुष्यात जे काही महत्त्वाचं आहे ते सर्व काही शिकवलं.आयुष्य कितीही कठीण असलं तरी, आशा कायम असुदे, पडल्यावर परत उठा. आपली आवड जपा आणि सकारात्मकतेनं जगा, कधीही हार मानू नका.बाबा तुमच्यामध्ये धाडसी वृ्त्ती होती आणि तुम्ही मलाही तसंच जगायला शिकवलंत."
त्यानंतर करणवीरने म्हटलंय,"तुम्ही मला स्वप्न पाहायला आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहायला शिकवलंत. शिवाय कधीही कोणतंही काम अपूर्ण ठेवायचं नाही, असा मोलाचा सल्ला दिलात. तुम्ही दिलेली सर्वात मोठी शिकवण म्हणजे मानवतेची. एखाद्या व्यक्तीची केवळ त्याच्या कपड्यांवरून नव्हे तर त्याच्या वागण्यावरून आणि आदरावरून परीक्षा घेतली जाते.बाबा... तुमच्याबद्दल बोलणारा प्रत्येकजण एकच गोष्ट म्हणतो, तुम्ही एक चांगले माणूस होता आणि ते अगदी खरं आहे.तुमचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो." शेवटी, करणवीरने लिहिलंय, "प्रिय बाबा,माझं कायम तुमच्यावर प्रेम राहिल.आता, शांततेत तुमच्या पुढच्या प्रवासाला जा. मी इथे सर्वकाही सांभाळेन." अशी पोस्ट लिहून अभिनेत्याने त्याच्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
महेंद्र बोहरा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, इंडस्ट्रीतील नामांकित दिग्दर्शकांपैकी ते एक होते. उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच ते उत्कृष्ट लेखकही होते. महेंद्र बोहरा यांचा जन्म १९४६ मध्ये जोधपूर येथे झाला. त्यांनी 'तेजा', 'टक्कर', 'लष्कर', 'प्यार का कर्ज', 'हुमे तुमसे प्यार कितना' आणि 'गोपाला' सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. तसेच इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांसोबत देखील काम केलंय.