'ठरलं तर मग' मधील लोकप्रिय अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी! थेट रणबीर कपूरसोबत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 11:31 IST2026-01-18T11:28:51+5:302026-01-18T11:31:45+5:30
'ठरलं तर मग' मधील अभिनेत्रीचं नशीब फळफळलं! रणबीर कपूरसोबत काम करण्याची मिळाली संधी, अनुभव शेअर करत म्हणाली...

'ठरलं तर मग' मधील लोकप्रिय अभिनेत्रीला मिळाली मोठी संधी! थेट रणबीर कपूरसोबत झळकली, पोस्ट शेअर करत म्हणाली...
Television: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात जास्त बघितली जाणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग. प्रेक्षकांच्या अखंड प्रेमामुळे गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील सायली- अर्जुनसह प्रत्येक पात्राने आता घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली असून प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. याच मालिकेत सायलीच्या मैत्रीण म्हणजेच कुसुम ताईची भूमिका अभिनेत्री दिशा दानडेने साकारली आहे. प्रत्येक चांगल्या वाईट प्रसंगात सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणाऱ्या या कुसुमताईचं पात्र अनेकांना भावलं आहे. सध्या दिशा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
नुकतीच सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. दिशा दानडे चक्क एका जाहिरातीत बॉलिवूडचा सुपरस्टार रणबीर कपूरबरोबर झळकली आहे. या निमित्ताने अभिनेत्रीचं सुपरस्टासोबत काम करण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. सोशल मीडियावर या संदर्भात खास पोस्ट लिहून तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहिलंय,"मी खूप कृतज्ञ आणि खूप आनंदी आहे. मला एका जाहिरातीत रणबीर कपूरसोबत काम करण्याची संधी मिळाली.आणि हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे आणि हा आनंद मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणं ही खूप मोठी गोष्ट असून यातून मला खूप काही शिकता आलं."
त्यानंतर अभिनेत्री रणबीर कपूरसोबत काम करण्याचा अनुभव शेअर करत म्हणाली," रणबीर केवळ एक अप्रतिम कलाकारच नाही, तर तो अत्यंत नम्र आणि आपल्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित आहे. हे माझ्यासाठी खरोखरच प्रेरणादायी आहे.माझ्यावर विश्वास ठेवून मला या जाहिरातीत कास्ट केल्याबद्दल कास्टिंग टीमचे खूप खूप आभार, आणि प्रोडक्शन हाऊसचेही मनापासून आभार... ज्यांनी माझ्यासारख्या नवीन कलाकाराला काम करण्याची संधी दिली.शिवाय दिग्दर्शक ज्यांनी सेटवर कायम हससं-खेळतं वातावरण ठेवलं. आणि प्रत्येक कलाकाराला काम करण्याची वेगळी ऊर्जा मिळाली. प्रत्येक महत्त्वाकांक्षी आणि संघर्ष करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात ती संधी येतेच. फक्त वेळ यावी लागते, धीर धरा. सातत्याने प्रयत्न करत राहा. जेव्हा संधीचे दरवाजे बंद राहतात, तर तेव्हा दार ठोठावत राहा.कठोर परिश्रम, संयमाचं फळ नक्कीच मिळतं. या क्षणासाठी मी खूप मेहनत केली आहे, आणि मला इथे पोहोचायला मदत करणाऱ्या प्रत्येकाची मी मनापासून आभारी आहे.ही तर फक्त सुरुवात आहे." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने लिहिली आहे.