डेटिंग अॅपवर ओळख ते आयुष्यभराचे सोबती! 'अशी' जमली गायत्री-श्रीकांतची जोडी, घरच्यांना कळताच काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:46 IST2026-02-14T17:32:49+5:302026-02-14T17:46:31+5:30
डेटिंग अॅपने बनादी जोडी, एकमेकांची नावं ओळख लपवली अन्...; अशी फुलली गायत्री-श्रीकांतची लव्हस्टोरी

डेटिंग अॅपवर ओळख ते आयुष्यभराचे सोबती! 'अशी' जमली गायत्री-श्रीकांतची जोडी, घरच्यांना कळताच काय घडलेलं?
Gayatri Datar Lovestory: अभिनेत्री गायत्री दातार ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय नायिका आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून ती नावारुपाला आली. अलिकडेच गायत्रीने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची जाहिरपणे कबुली दिली. त्यानंतर आता लवकरच ती श्रीकांत चवरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. दरम्यान, श्रीकांत आणि गायत्रीची पहिली भेट कशी झाली. त्यांची गाठ कशी जुळली याबद्दल व्हेलेंटाईनच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.
नुकतीच गायत्री दातार आणि तिचा होणारा नवरा श्रीकांत चवरे यांनी जोडीने राजश्री मराठीला मुलाखत दिली. यामुलाखतीत त्यांनी आपल्या पहिल्या भेटीचा किस्सा शेअर केला आहे. दरम्यान, श्रीकांत चवरे म्हणाला,आम्ही एकमेकांना गेल्या दीड वर्षांपासून डेट करतोय. एका डेटिंग अॅपवर आमची भेट झाली.मी जास्त मराठी शो बघत नाही. जेव्हा गायत्रीच्या मालिका सुरू होत्या, तेव्हा मी जपानमध्ये कामाला होतो. त्यामुळे मला तिच्या कामाबद्दल फारशी माहिती नव्हती. मी हिचं प्रोफाइल पाहिलं, अभिनेत्री आहे असं दिसलं. त्यानंतर मग आमचं बोलणं सुरू झालं. पण, तिने मला तेव्हाही तिचं पूर्ण नाव सांगितलं नव्हतं. ‘मी गायत्री आहे’ इतकंच तिनं सांगितलं होतं. मी तिला एकदा सहज विचारलं की, तू काय करतेस? त्यावेळी तिने मला घरात टीव्ही पाहतानाचा एक फोटो पाठवला. त्यात खाली एक पाटी ठेवली होती, गायत्री दातार.माझं असं झालं,लोक घराच्या दारावर पाटी लावतात, हिच्या नावाची पाटी घरात का आहे? ती ‘बिग बॉस’च्या घरातली नेमप्लेट होती. मी तेव्हा हिच्याबद्दल थोडं सर्च केलं.मग मला समजलं ही अभिनेत्री आहे. हिने असं-असं काम केलंय. त्यानंतर मग आम्ही भेटलो, आमच्यात छान बोलणं झालं. तिथून मग सगळी सुरुवात झाली."
यालाच जोडून पुढे गायत्री म्हणाली,"माझ्या काही मित्र-मैत्रिणी डेटिंग अॅपवर होते. एकेदिवशी आम्ही सगळे मित्र-मैत्रिणी भेटलेलो तेव्हा त्यांनी मला या अॅपबद्दल सांगितलं होतं.त्यानंतरही माझ्या मनात प्रश्न होते. पण, असंच दोन-तीन महिन्यानंतर मी त्यावर प्रोफाईल ओपन केली. त्यावर बऱ्याच लोकांनी मला ओळखलं. तेव्हा मला कोणत्याही फॅनबॉयला भेटण्याची इच्छा नव्हती. कोणीतरी माझा फॅन आहे म्हणून आपण डेटवर चाललोय हे असं मला नको होतं. मी एक-दोन डेट्सवर सुद्धा गेले होते, पण आमच्या व्हाइब्स मॅच झाल्या नाहीत. त्यानंतर मग मी श्रीकांतचं प्रोफाइल पाहिलं. याच्या प्रोफाईलमध्ये मराठी भाषा शेवटी लिहिलेली होती. सुरुवातीला मला हा साऊथ इंडियन वगैरे आहे, असं वाटलं.त्यानंतर आमचं बोलणं सुरू झाल्यावर मी त्याला माझं नावही सांगितलं नव्हतं, नंबर वगैरे देणं तर खूप दुरची गोष्ट होती. "
गायत्री-श्रीकांतचे असे जुळले सूर...
"आम्ही डेटिंग अॅपवरच चॅट करायचो. एक दिवस आमचं भेटायचं ठरलं. कुठे भेटायचं, हे नव्हतं ठरलं. मला वाटलं ५-५:३० ला ठरवू. मग दुपारच्या वेळेस मी मैत्रिणीकडे गेलेले. संध्याकाळी याला मेसेज करायचा म्हणून फोन पाहिला, तर याने भेटायचं कॅन्सल केलं. माझ्या डेटिंग अॅपचं नोटिफिकेशन बंद होतं, म्हणून मला याचे मेसेज आलेले कळलं नाही. त्याने खूप मेसेज केले होते पण ते मी लवकर मेसेज पाहिले नाहीत म्हणून कॅन्सल झालं. नंतर हा बाहेरगावी गेला. पुढे आम्ही एक महिन्यांनी भेटलो. तेव्हा आम्ही रात्री १० वाजता पहिल्यांदाच भेटलो. कारण, माझ्या मालिकेचं शूट सुरू होतं. तेव्हा अर्धा तास भेटू असं ठरलेलं पण तेव्हा आमच्या तीन तास गप्पा रंगल्या होत्या. तेव्हा जाणवलं की आमच्या वाईब्स मॅच होत आहेत. त्यानंतर मग आम्ही भेटत गेलो.असा खुलासा गायत्रीने केला. "
मग श्रीकांत म्हणाला,"मला पहिल्या एक-दोन महिन्यांतच समजलं होतं की, आमचं छान जमेल. पण, तिने कधी भावना एक्स्प्रेस केल्या नव्हत्या. त्यानंतर मग आम्ही एकदा लोणावळ्याला गेलो होतो. त्यावेळी तिने मनातल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या होत्या." असं श्रीकांत पुढे म्हणाला.
'अशी' होती कुटुंबियांची प्रतिक्रिया...
घरच्यांबद्दल सांगताना श्रीकांत म्हणाला की, 'माझ्या बाबांनी घरी लग्नाचा विषय काढला होता. तेव्हा मी गायत्रीबद्दल सगळं सांगून टाकलं. आई तेव्हा म्हणाली होती, अच्छा म्हणून तू ‘चल भावा सिटीत’ कार्यक्रम बघत होतास का? माझे आई-बाबा तिला भेटले. त्यांना आता माझ्यापेक्षा जास्त गायत्री आवडू लागलीये." तर गायत्री म्हणाली,"माझ्या घरी लग्न हा विषयच नव्हता. तुझ्या आयुष्यात तू आनंदी राहिली पाहिजे एवढंच माझ्या आई-बाबांचं म्हणणं होतं. मग माझ्या बाबांनी बंबल वगैरे काय असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. मग मी त्यांना समजावून सांगितलं. त्यांना मग मी याच्याबद्दल माहिती दिली. बाबांनी त्याला सकाळीच फोन केला. तो नुकताच झोपेतून उठला होता. त्यानंतर जवळपास ४५ मिनिटं हे दोघंही फोनवर बोलत होते. बाबांनी त्याला काळजीपोटी माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट सांगितली, माझ्या कामाची माहिती दिली." असा खुलासा दोघांनी केला.