वजन कमी झालं अन्...; दिशा परदेशीने आजारपणामुळे मालिका सोडली? म्हणाली-"मनावर दगड ठेवून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 13:23 IST2025-05-17T13:10:14+5:302025-05-17T13:23:01+5:30
"मी मालिका सोडली, कारण..."; 'लाखात एक आमचा दादा' फेम दिशा परदेशीचा मोठा खुलासा, म्हणाली-"खूप वाईट..."

वजन कमी झालं अन्...; दिशा परदेशीने आजारपणामुळे मालिका सोडली? म्हणाली-"मनावर दगड ठेवून..."
Disha Pardeshi : झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिकेचा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. मागील काही दिवसांपासून या मालिकेचा सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. याचं कारण म्हणजे मालिकेत तुळजाची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशीने अलिकडेच मालिकेतून एक्झिट घेतली. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले. दिशाने आजारपणामुळे लाखात एक आमचा दादा मालिकेतून निरोप घेतला होता. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने ती कोणत्या आजाराने त्रस्त होती याबाबत तिने खुलासा केला आहे.
नुकतीच दिशा परदेशीने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "मला जो आजार झाला होता त्याचा गेले २-३ महिने मी सामना करत होते. प्रेक्षकांना याबद्दल माहित नव्हतं. पण, नंतर तो आजार एवढा वाढला की डॉक्टरांनी मला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी मनावर दगड ठेवून मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. कारण आरोग्याशिवाय काहीच नाही. चांगलं आरोग्य असेल तर आपण चांगलं काम करु शकतो. या सगळ्याचा परिणाम माझ्या कामावर परिणाम झाला. मीही त्यामुळे खूप डिस्टर्ब होते. त्यामुळे खूप वाईट वाटलं, कारण कुठेतरी असं वाटतं होतं की खरंच माझा हा निर्णय योग्य आहे का पण, आता मी तो निर्णय बरोबर घेतला असं वाटतंय."
प्रेक्षकांना सांगितलं कशी काळजी घ्यावी
पुढे दिशा आपल्या आजारपणाबद्दल बोलताना म्हणाली, "आमच्या मालिकेचं शूटिंग साताऱ्याच्या एका गावात होतं. जेव्हा मी शूटिंगसाठी घरून निघाले तेव्हा माझं वजन ५७ किलो होतं. जेव्हा मी ५-६ महिन्यांनी घरी परत आले, तेव्हा माझं वजन ४४ किलो झालेलं होतं. त्यामुळे या आजारात वजन खूप कमी होतं. वजन एवढ्या झपाट्याने कमी झाल्यामुळे प्रोडक्शन आणि चॅनेलला सुद्धा समजलं की नक्कीच ही मोठ्या त्रासात आहे. UTI चं निदान झाल्यावर मला डॉक्टरांनी विशिष्ट प्रकारचं डाएट सुद्धा फॉलो करण्यासाठी दिलं होतं. या सगळ्या गोष्टी मी केल्या पण, एका वेळेनंतर आपल्याला प्रकृतीकडे जास्त लक्ष देऊन थांबणं गरजेचं वाटतं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.
अभिनेत्रीने प्रेक्षकांना यूटीआयबद्दल केलं जागरुक
"तेलकट, तिखट, मसालेदार असे पदार्थ UTI झाल्यावर खायचे नसतात. याशिवाय नॉनव्हेज सुद्धा खायचं नसतं. जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर, हा आजार अनेकांसाठी जीवघेणाही ठरू शकतो... माझ्या काही मैत्रिणींनी या आजाराकडे वेळीच लक्ष दिली नाही आणि त्यांना पुढे जाऊन २ महिने बेडरेस्ट घ्यायला डॉक्टरांनी सांगितलं होतं. मला या मालिकेच्या निर्मात्या श्वेता शिंदेंनी खूप मदत केली. स्त्रीरोग तज्ज्ञांकडे नेलं. मी गोळ्या घेतल्या, आराम केला पण, पुन्हा तेच... मी माझ्या बाजूने सगळी काळजी घेतली. प्रोडक्शनने सुद्धा माझी काळजी घेतली. पण, हे सगळं करून परत तेच वॉशरूम वापरावं लागायचं ज्यामुळे या सगळ्या आजाराची सुरुवात झाली होती. त्यामुळे थोडे दिवस गेल्यावर मला स्वतःसाठी निर्णय घेऊन आराम करणं गरजेचं वाटलं. मी ३ महिने सेटवर उपचार घेतले. आताही ट्रिटमेंट सुरू आहे. हळुहळू मी यातून बरी होतेय." असं दिशा परदेशीने सांगितलं.